कारगिल युद्ध स्मारकाला तीन्ही सेनाप्रमुखांचे अभिवादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताने पाकिस्तानवर कारगिल युद्धात मिळविलेल्या विजयाचे स्मरण म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘विजय दिवस’ शानदारपणे साजरा करण्यात आला आहे. देशभरात यानिमित्ताने सरकारी तसेच खासगी पातळीवरही अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यक्रम येथील हुतात्मा स्मारकापाशी आयोजित करण्यात आला होता. तीन्ही सेनाप्रमुखांनी दिल्लीतील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्रे अर्पण करुन हुतात्मा सैनिकांना अभिवादन केले.
तीन्ही सेनाप्रमुख सकाळीच कारगिल
भारतीय जनता पक्षाने या दिनाचे औचित्य साधून श्रीनगरमधील लाल चौकापासून कारगिलमधील हुतात्मा स्मारकापर्यंत दुचाकी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत 700 हून अधिक कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा समावेश होता. ही दुचाकी यात्रा हुतात्मा स्मारकापाशी दुपारी पोहचली. यात्रेत सहभागी झालेल्यांनी स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर यात्रेची समाप्ती झाली. काश्मीर भागात अशी यात्रा स्वातंत्र्यानंतरच प्रथमच काढण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींचे अभिवादन
कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांची आणि अधिकाऱयांची आठवण भारतीयांना नेहमीच प्रेरणा देत राहील, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यांनीही हुतात्मा सैनिकांना अभिवादन करणारे आपले वक्तव्य प्रसारित केले. हा दिवस भारतमातेच्या प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे प्रतिक आहे, असाही संदेश त्यांनी दिला आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंग तसेच अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांना अभिवादन केले.
कारगिल युद्ध
1999 मध्ये पाकिस्तानने भारताच्या कारगिल भागातील अनेक पर्वतशिखरांवर आपले सैनिक पाठवून कबजा करण्याचा प्रयत्न केला होता. या सैनिकांना तेथून हटवून आपला भाग पुन्हा मिळविण्यासाठी भारतीय सैनिकांना पराक्रमाची शर्थ करावी लागली होती. दोन महिने हा संघर्ष चालला होता. अखेर भारताने पाकिस्तानी सैनिकांना मागे हटवून आपली सर्व पर्वतशिखरे यशस्वीरित्या सोडविली. 26 जुलै 1999 या दिवशी भारताच्या सैनिकांनी पाकिस्तानला पूर्णतः नेस्तनाबूत केले. या युद्धात भारताचे 500 हून अधिक सैनिक हुतात्मा झाले होते. तर पाकिस्तानला त्याचे हजारो सैनिक गमवावे लागले होते.