बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ विस्ताराला भाजप हायकमांडने परवानगी दिल्यानंतर आज दुपारी २९ आमदारांनी नवीन मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये एकही उपमुख्यमंत्री नाहीय. बोम्माई यांना गेल्या आठवड्यात भाजपने नवे मुख्यमंत्री म्हणून पुढे आणले होते. यानंतर त्यांनी 28 जुलैला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. बी. एस. येडीयुराप्पांना राजीनामा द्यावा लागला होता. पण अटी घालून राजीनामा दिला होता. त्या अटी पैकीच एक अट म्हणजे मुलाला मंत्रिपद देणे. पण बोम्माईंच्या मंत्रिमंडळात येडियुरप्पांच्या मुलाला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही.
दरम्यान, येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पद सोडण्यासाठी दिल्लीतील नेत्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. खासदार असलेला मोठा मुलगा बी.एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा बी.एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा या अटी होत्या. पैकी लिंगायत समाजाचा नेता निवडून भाजपश्रेष्ठींनी येडीयुराप्पांची एक अट मान्य केली आहे. बोम्माई हे येडीयुराप्पांचे खास आहेत. परंतू अन्य दोन अटी मान्य केलेल्या नाहीत.