लोकसभा निवडणूक बरोबर एक वर्षावर आली असताना नरेंद्र मोदींना टक्कर देणारा लाल अजून जन्मायचा आहे असे एकंदर भासवले जात असताना सत्ताधाऱ्यांसाठी विचित्र घटना घडत आहेत. कालपरवापर्यंत पंतप्रधानांचे खासमखास मानले जाणारे जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 40 जवान शहिद झालेल्या पुलवामामधील घटनेकरता मोदी सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार आहे असे ठासून सांगत रान उठवले आहे. माजी लष्कर प्रमुख शंकर रॉयचौधरी यांनी ज्याप्रकारे ही घटना एका देशाच्या सुरक्षेकरताच्या नाजूक भागात घडली आहे त्याची जबाबदारी साक्षात पंतप्रधान टाळू शकत नाहीत अशी स्पष्टोक्ती करून सत्ताधाऱ्यांमधील बैचैनी अजूनच वाढवली आहे.
बऱ्याच प्रसारमाध्यमांनी सत्यपाल मलिक यांच्या खळबळजनक दाव्यांना दाबण्याचे काम केले असताना सत्ताधारी पक्षानेदेखील साऱ्या प्रकाराबाबत मौन बाळगले आहे. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी काहीशी अवस्था विरोधी पक्षांची झाली आहे. गेली लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पुलावामाची घटना घडवून आणली होती का असा खडा सवाल विरोधी पक्ष विचारत आहेत. मलिक यांनी 14 फेब्रुवारी 2019 ला झालेल्या या घटनेबाबत सत्यकथन केले असेल तर आंतरराष्ट्रीय जगतात देखील भारताला बऱ्याच अडचणींना झेलावे लागेल असे देखील त्यांचे मत आहे. मलिक अजून भाजपचेच सदस्य आहेत असा त्यांचा दावा आहे.
राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार बरेच विरोधी पक्ष एकत्र येऊन मलिक यांच्या वक्तव्यानंतर एक संयुक्त पत्रक काढून सरकारला लवकरच जाब विचारणार आहेत. अदानी प्रकरणात वातावरण अगोदरच तापलेले असताना देशभक्तीचा आपणच केवळ वसा घेतलेला आहे आणि आपले विरोधक म्हणजे देशद्रोही आहेत, असे भासवणाऱ्या राज्यकर्त्यापुढे हे अजब संकट आहे. विरोधी ऐक्मयाची प्रक्रिया कोठपर्यंत आली हे ताबडतोब कळून येत नसले तरी असे ऐक्मय करण्याचा जोरदार पुरस्कार करणाऱ्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले आहे. पाटण्यातील राजदच्या राष्ट्रीय मुख्यालयासमोर एक मोठे पोस्टर लावून ही घोषणा करण्यात आली आहे. नितीश यांनी तेजस्वी यादव हे पुढील मुख्यमंत्री असतील असे घोषित पूर्वीच केले होते. आता त्याला प्रतिसादात्मक अशी ही घोषणा आहे. राज्यातील सत्ताधारी आघाडी आणि तिचा जनाधार कायम राखण्यासाठी ही शक्कल लढवण्यात आल्याचे बोलले जाते. नितीश कुमार हे राजकारणातील एक मोठे संधीसाधू नेते असून त्यांचे उत्तरप्रदेशातील अखिलेश यादव यांच्याशी देखील गुळपीठ आहे. भाजपविरोधात पूर्णपणे ऐक्मय झाले तर सत्ताधारी पक्षाला 100च्या आत गुंडाळले जाऊ शकते असे नितीश म्हणत आहेत तर सद्यस्थितीत त्याला 200च्या आतच जागा मिळतील असा ममता बॅनर्जी यांचा होरा आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला त्यांच्या जन्मगावी महु येथे अखिलेश यादव, जयंत चौधरी आणि भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद एकत्र आले होते ती एक प्रकारे लोकसभा निवडणुकीतील उत्तरप्रदेशातील त्यांच्या युतीची नांदीच मानली जाते. आपण काँग्रेसबरोबर आघाडी करणार नाही असे अखिलेश यांनी पहिल्यांदाच जाहीर केले आहे तर मायावती यांनी ‘एकला चलो रे’ ची धून वाजवणे सुऊ केले आहे. तात्पर्य काय तर उत्तरप्रदेशात चौरंगी सामना झाला तर भाजपची बल्ले बल्ले होणार हे सद्या तरी दिसत आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या राज्यातील अबकारी कर घोटाळ्यात सीबीआयच्या उलटतपासणीला गेल्या रविवारी सामोरे जावे लागले. पण याने डगमगून न जाता केजरीवाल यांनी केंद्रावरील हल्ला अजूनच तीव्र केला आहे. कोणाचेही नाव न घेता दिल्ली विधानसभेत त्यांनी एक गोष्ट सांगितली. चौथी पास असलेला राजा झाल्याने राज्याचे किती हाल झाले, लोकांना किती त्रासाला तोंड द्यावे लागले याचे त्यांनी रसभरीत वर्णन करून वारंवार हास्याचे फवारे उडवले. पंतप्रधानांची डिग्री दाखवा असा आग्रह केल्याने न्यायालयाने 25,000 ऊपये दंड ठोठावला असूनही मोदींची प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे टर उडवणे केजरीवाल यांनी सुरूच ठेवले आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून नुकतीच मान्यता मिळाल्यानंतर आता मोदींवर प्रहार करून आपले नेतृत्व राष्ट्रीय करण्याचा केजरीवाल यांचा बेत दिसत आहे. गेल्या वषी झालेल्या दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन निवडणुकीत राजधानीतील सात लोकसभा प्रभागांपैकी पाचमध्ये केजरीवाल यांनी भाजपला पाणी पाजले होते. नवीन परिस्थितीमध्ये राजधानीत केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशी संगनमत केले तर तेथील प्रत्येक जागा भाजपला निकराने लढवावी लागेल.
केजरीवाल यांच्यानंतर ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे सीबीआय सारख्या तपास संस्थांचा मोर्चा वळेल असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. ममता आणि त्यांचा वादग्रस्त पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांना ढील का दिली जात आहे? त्यांचा जाब का घेतला जात नाही आहे? केजरीवाल यांची सीबीआय उलटतपासणी घेती तर मग दीदींना का मोकळे सोडती? अशी मोहीमच भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी सुऊ केली आहे. महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या शिवसेना संपवण्याकरता सगळे डाव खेळूनदेखील उद्धव यांची ताकद वाढत आहे हे त्यांच्या जाहीर सभांतून दिसत आहे. त्याने दिल्लीश्वर बेचैन झाले आहेत. भरीस भर म्हणजे महाराष्ट्राबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निकाल लवकरच लागणार आहे. येत्या पंधरा दिवसात राज्यात आणि दिल्लीत ‘दोन बॉम्बस्फोट’ होणार आहेत असा सुप्रिया सुळे यांनी अगोदरच दावा केला आहे. कर्नाटकात काँग्रेसकडून कडवे आव्हान उभे ठाकले असताना राज्य भाजपमधील हेवेदावे काही केल्या संपत नाहीत असे दिसत आहे. ये•ाrयुराप्पा यांचा मुलगा विजयेंद्र हा राज्यातील मोठा युवक नेता म्हणून उदयाला येऊ नये म्हणून पक्षाने तेजस्वी सूर्या सहित साऱ्या तऊण नेत्यांना स्टार प्रचारक यादीत वगळलेले आहे.
दक्षिण भारतात निकराच्या लढाईत गुंतले असतानाच भाजपकडून येती निवडणूक पंतप्रधान दक्षिणेतूनदेखील लढू शकतात असा ट्रायल बलून सोडला आहे. मोदींचे नेतृत्व हे सर्व देशभर लोकमान्य आहे असा संदेश देण्यासाठी तामिळनाडूतील रामनाथपुरम उर्फ रामेश्वर या दक्षिणेतील ज्योतिर्लिंग असलेल्या शहरातून ते निवडणूक लढवू शकतात. याचबरोबर ते वाराणसीमधून देखील निवडणूक लढवणार असे सांगितले जात आहे. ते देखील ज्योतिर्लिंगच असल्याने उत्तर-दक्षिण अशी हिंदुत्वाची पताका फडकवण्याचा हा बेत दिसत आहे. रामेश्वरमधील लिंगाची स्थापना साक्षात प्रभू रामचंद्रांनी केली असे मानले जाते.
2024 उजाडताच अयोध्येतील भव्य राम मंदिर भक्तांसाठी खोलून मतपेट्या भरवण्याचा जणू जंगी कार्यक्रम अगोदरच जाहीर झालेला आहे. मोदींना पंतप्रधानपदाची तिसरी टर्म देखील मिळू शकते असा सत्ताधारी आघाडीतील सध्याचा रागरंग आहे. अशावेळी कर्नाटकमधील निवडणुकीचा निकाल या रंगाचा भंग करणार का हे येत्या 13 ला कळणार आहे. नेहमी राणा भीमदेवी थाटात गर्जना करणारे नेते सध्या सावध दिसत आहेत. पाल चुकचुकत आहे.
सुनील गाताडे