शेहला रशीदकडून पंतप्रधान मोदी, अमित शाह यांचे कौतुक
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जेएनयू विद्यार्थीसंघाची माजी उपाध्यक्ष शेहला रशीदने काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. कलम 370 हटविण्याचा निर्णय योग्य होता आणि यामुळे काश्मीरमध्ये शांतता नांदू लागली आहे. काश्मीर हे काही गाझा नव्हे असे म्हणत शेहलाने तेथे झालेल्या बदलांचे श्रेय पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना दिले आहे.
भारत हा विविधतांनी नटलेला देश आहे. येथे मॉब लिंचिंगशी संबंधित काही प्रकरणे समोर आली आहेत, तसेच मुस्लिमांच्या विरोधात वक्तव्येही करण्यात आली आहेत. या घटनांमुळे मुस्लीम म्हणून त्रासही झाला. परंतु या घटनांना आता अनेक वर्षे उलटली आहेत. तर दुसरीकडे सरकारने काश्मीर प्रकरणी तोडगा शोधून काढला असल्याचे शेहलाने वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले आहे.
कलम 370 हटविण्यात आल्यावर आम्ही पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात गेलो नाही, तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयातही गेलो नाही. आम्ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचलो. कलम 370 हटविण्याच्या निर्णयाला विरोध करण्यास कुठलाच अर्थ नसल्याचे उमगल्यावर मी माझी याचिका मागे घेतली. कलम 370 हटविण्याचे चांगले निष्कर्ष समोर आले आहेत. लोकांना चांगले जीवन मिळावे, अधिकार प्राप्त व्हावेत हेच माझे म्हणणे आहे. सरकारने लोकांना त्यांचे अधिकार मिळवून दिले आहेत असे शेहलाने म्हटले आहे.
आता काश्मीरमध्ये पाहिल्यावर आनंद होतो, काश्मीरमधील हिंसा रोखण्यासाठी मोठ्या बदलांची गरज होती. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी कुठल्याही संघर्षाशिवाय हे करून दाखविले. काश्मीर हे काही गाझा नव्हे, येथील लोक केवळ निदर्शनांमध्ये सामील होते. ज्या दिवशी जेकेएनसी आणि भाजपमध्ये मैत्री होईल त्यादिवशी काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार असल्याचा दावा तिने केला आहे.