सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात उच्च न्यायालयाला आदेश
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नोव्हेंबर 10, 2022 या दिवशी गुजरातच्या मोर्बी येथे नदीवरील झुलता पूल कोसळून झालेल्या भीषण अपघाताची चौकशी करण्यात येत असून या चौकशीवर गुजरातच्या उच्च न्यायालयाने लक्ष ठेवावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत गुजरात उच्च न्यायालयाला हा आदेश दिला आहे.
गुजरात उच्च न्यायालयानेही या दुर्घटनेची दखल स्वतःहून घेऊन चौकशी करणाऱया पालिकेला काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. या प्रकरणी चौकशी स्वतंत्ररित्या आणि कोणत्याही दबावाविना व्हावी यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे. मोर्बी नगरपालिकेच्या जबाबदारीचीही चौकशी केली जात आहे.
141 जणांचा बळी
मोर्बी नदीवरील 143 वर्षांचा झुलता पूल कोसळून झालेल्या या अपघातात 141 जणांचा बळी गेला होता. या बळींमध्ये 47 बालकांचा समावेश होता. ही घटना गंभीर असून त्याची चौकशी समयबद्ध पद्धतीने आणि प्रामाणिकपणे व्हावी, अशी लोकांची अपेक्षा असून हा अपघात ही एक विदारक शोकांतिका आहे. बळींना न्याय मिळाला पाहिजे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
कुटुंबियांची याचिका
या प्रकरणात दिलीपभाई चावडा यांनी याचिका सादर केली आहे. चावडा यांचे बंधू आणि भावजय या दोघांचाही या अपघातात मृत्यू झाला होता. त्यांचा 9 वर्षांचा मुलगा आता अनाथ झाला आहे. या पुलाच्या देखरेखीचे उत्तरदायित्व असणाऱया कंपनीच्या केवळ दुय्यम अधिकाऱयांना अटक झाली आहे. महत्वाचे आरोपी आणि कंपनी आणि नगरपालिकेचे वरीष्ठ अधिकारी अद्याप चौकशीच्या जाळय़ाच्या बाहेरच आहेत. चौकशी सर्वंकष पद्धतीने होऊन सर्व दोषींना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी चावडा यांच्या याचिकेत करण्यात आली आहे.
सातत्याने लक्ष ठेवा
या चौकशीवर सातत्याने लक्ष ठेवावे. साप्ताहिक अहवाल घ्यावा. ही दुर्घटना कशी घडली याचा शोध घेतला गेला पाहिजे. घटना घडण्यापूर्वीची परिस्थिती आणि घटना घडल्यानंतर झालेल्या हालचाली यांची अचूकपणे माहिती मिळणे आवश्यक आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.