वृत्तसंस्था/ तिऊवनंतपुरम
राज्यपालांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून केरळमध्ये अजूनही शाब्दिक वादावादी सुरूच आहे. आपल्या दौऱ्यादरम्यान पोलिसांनी सुरक्षेत दिरंगाई केल्याचा आरोप राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केला असतानाच आता मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या कार्यालयाने सोशल मीडियावर केंद्राने आपल्याला सीआरपीएफच्या झेड प्लस सुरक्षेखाली ठेवल्याची माहिती दिल्यानंतर काही तासांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर टीका केली. ‘आता राज्यात काय सीआरपीएफ शासन लागू करणार काय?’ असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. राज्यपालांनी शनिवारी केरळ पोलिसांच्या सुरक्षा त्रुटींविरोधात दोन तास रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले होते. यानंतर विजयन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. राज्यपालांना विधानसभेत अभिभाषण वाचायला वेळ मिळाला नाही, पण ते रस्त्यावर बसून दोन तास घालवू शकतात, असा टोमणा त्यांनी मारला.