सिद्दीकींवर होता हिंसा फैलावल्याचा आरोप
वृत्तसंस्था /लखनौ
केरळमधील पत्रकार सिद्दीकी कप्पन यांची लखनौ तुरुंगातून गुरुवारी सुटका करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने 23 डिसेंबर रोजी सिद्दीकी यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जामीन मंजूर केला होता. 28 महिन्यांनी सिद्दीकी तुरुंगातून बाहेर पडले आहेत.
सरकारला पसंत नसलेल्या व्यक्ती किंवा संस्थांना देशविरोधी ठरविण्याचा प्रकार सुरू असल्याचे म्हणत सिद्दीकी यांनी सरकारला लक्ष्य केले. आपण 6 आठवडय़ांपर्यंत दिल्लीत राहणार असून त्यानंतर केरळमध्ये परतणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाकडून सशर्त जामीन मंजूर झाल्यावर ईडीच्या विशेष न्यायाधीशांनी कप्पन यांची जामिनावर सुटका करण्याचा आदेश दिला होता.
उत्तरप्रदेशच्या हाथरस येथील बलात्कार तसेच हत्या प्रकरणादरम्यान कप्पन यांना अटक करण्यात आली होती. हवालाद्वारे रक्कम प्राप्त करत देशविरोधी कार्यांमध्ये त्याचा वापर करण्यासह अनेक आरोपांखाली कप्पन विरोधात ईडीने कारवाई केली होती.
उत्तरप्रदेश पोलिसांनी 8 ऑक्टोबर 2020 रोजी मसूद अहमद, सिद्दीकी कप्पन, अतिकुर्रहमान आणि मोहम्मद आलम यांच्या विरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली होती. आरोपी कप्पन हा पीएफआयचे मुखपत्र तेजस डेलीमध्ये काम करायचा. कप्पनवर दिल्ली दंगलीत सहभाग असल्याचाही आरोप आहे.
पीएफआयचे सदस्य केए रऊफ आणि अन्य सदस्यांना एका षड्यंत्राच्या अंतर्गत विदेशातून 1 कोटी 38 लाख रुपये देण्यात आल्याचे तपासात आढळून आले होते. रऊफ, सईद आणि अन्य सदस्यांनी हाथरस येथे जात सांप्रदायिक सौहार्द बिघडविणे, दंगली घडविणे आणि दहशतवाद फैलावण्याचा कट रचला होता असा आरोप आहे.