आटपाडीत रचला पाया; जिह्याच्या विकासासाठी एकत्रित कामाची ग्वाही; आम. गोपीचंद पडळकरांच्या वाढदिवसाचे निमित्त
आटपाडी प्रतिनिधी
सांगली जिह्याच्या राजकारणात एकाच पक्षात असतानाही एकमेकांच्या विरोधात भूमिका असलेले खासदार संजयकाका पाटील व आमदार गोपिचंद पडळकर यांच्यात अखेर एकोपा झाला. आमदार पडळकर यांच्या वाढदिनी आयोजित कार्यक्रमात भाजपमध्येच दोन परस्परविरोधी टोक असलेल्या या दोन्ही नेत्यांना एकत्र करण्यात आटपाडीचे अनिल पाटील व विटय़ाचे शंकर मोहिते यांनी घेतलेला पुढाकार फलदायी ठरला.
सांगली लोकसभेच्या गत निवडणुकीत भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांच्या विरोधात वंचितकडून गोपिचंद पडळकर यांनी लढत दिली. या लढतीत संजयकाका पाटील यांनी विजय मिळविला. लोकसभा निवडणुकीपासून आजपर्यंत या दोन्ही नेत्यांमध्ये व त्यांच्या कार्यकर्त्यांत संघर्ष कायम आहे. गोपिचंद पडळकर हे भाजपमध्ये आल्यानंतर पक्षाने त्यांना आमदारकीची संधी दिली. शिवाय प्रवक्ते पदही बहाल केले. खासदार संजयकाका पाटील व आमदार गोपिचंद पडळकर हे एकाच पक्षात असलेतरी ते एकमेकांचे विरोधकच म्हणून पाहिले गेले.
अखेर या दोन्ही नेत्यांमध्ये एकोपा घडवून संघर्ष कमी करण्यासाठी आमदार गोपिचंद पडळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आटपाडीचे युवा नेते अनिल पाटील व खानापुर तालुक्यातील युवानेते शंकर मोहिते यांनी पुढाकार घेतला. आणि राजकीय हाडवैर असलेले हे दोन्ही नेते शनिवारी आटपाडीत एकत्र आले आणि एकजुटीचा निर्धार केला.
खासदार संजयकाका पाटील म्हणाले, राजकारणत कोण, कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. लोकांचा विकास करण्यासाठी आपल्याला राजकारण करायचे आहे. साखर कारखाना सुरू करण्यासाठी राजेंद्रअण्णा देशमुख, गोपिचंद पडळकर व आम्ही प्रयत्न करू. प्रत्येकाला पुढे जायचे आहे. जिल्हय़ाचा, तालुक्याचा विकास करण्यासाठी आपण एकजुटीने काम करू. एमआयडीसीसाठी आमदार पडळकर प्रयत्न करताहेत. शेंडगेबापूंच्या नंतर समाजात निर्माण झालेली पोकळी भरून काढत आमदार गोपिचंद पडळकर हे गतिमान नेतृत्त्व म्हणून राज्यभर काम करत आहेत. टेंभू, एमआयडीसह अन्य प्रश्न सोडविण्यासाठी गोपीचंद पडळकर व आम्ही एकजुटीने काम करू, अशी ग्वाहीही खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, माझ्या वाढदिनी अनिलशेठ यांनी भावना व्यक्त केल्या. जिल्हय़ाच्या विकासाच्या राजकारणासाठी मी आणि संजयकाका एकोप्याने काम करू. विकासात आम्ही कमी पडणार नाही. वंचित गावांना टेंभूचे पाणी मिळणार आहे. आटपाडी तालुक्यातील इंच आणि इंच जमीन ओलिताखाली आणण्याचा संकल्प मी आणि संजयकाका करत आहोत.
राजेंद्रअण्णा देशमुख यांना अडचणीत अणण्यासाठी जिल्हा बँक प्रयत्न करत असेलतर आपण वरिष्ठांकडे जावु. जिल्हा बँकेत सर्वकाही अलबेल नाही. कारखान्याला अडचणीत आणले तर जिल्हा बँकेबाबत कारवाई करू. राजेंद्रअण्णांच्या खांद्याला खांद्या लावून उभे राहु. जिल्हा बँक अडचण आणत असून त्यावर प्रशासक आणुया, असे आवाहनही त्यांनी खासदार संजयकाकांना केले.
पंढरपुर ते कराड रेल्वेमार्ग आटपाडीमार्गे जोडण्यासाठी खासदार संजयकाकांनीही प्रयत्न करावेत. टेंभूकडून कामथ येथील एमआयडीसीसाठी पाण्याचे पत्र मिळाले आहे. मी आणि संजयकाका एकत्रित हा प्रश्न सोडविण्यासाठी काम करू. अनिलशेठ पाटील यांची हवा तालुक्यात सुरू आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे राहू. आटपाडीमध्ये खासदार संजयकाका पाटील व आमदार गोपिचंद पडळकर यांच्या एकोप्याची नांदी घडली असून जिल्हय़ातील विकासासाठी या दोन्ही नेत्यांच्या विकासाची गाडी सुसाट धावावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. याप्रसंगी ब्रह्मानंद पडळकर, श्रीरंग कदम, विकास कदम, विपुल कदम, विष्णु अर्जुन, जयवंत सरगर, दादासाहेब पाटील, प्रकाश बनसोडे, राहुल सकळे, नितीन पाटील, संग्राम माने आदि उपस्थित होते.
झाले गेले गंगेला मिळाले..!
खा. संजयकाका व आ. पडळकर यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणारे अनिल पाटील म्हणाले, हे दोन नेते एकत्र आल्याने जग जिंकल्याचा आनंद झाला आहे. वर्षांपासून या एकोप्याची प्रतीक्षा सर्वांना होती. या दोन्ही नेत्यांनी एकत्र येवुन काम करावे. मी आणि शंकरनानांनी प्रयत्न केले. त्यात यश आले. या दोन्ही नेत्यांनी लोकांच्या अपेक्षेसाठी एकजुटीने काम करावे. आत्ता खऱया अर्थाने जिल्हय़ाचा सर्वांगिण विकास होईल. संजयकाका-पडळकर या जोडीने ’झाले गेले गंगेला मिळाले’ या तत्त्वानुसार जिल्हा आघाडीवर ठेवावा, असे आवाहनही अनिल पाटील यांनी केले.