ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जळगाव जिल्हा दूध संघातील चोरीप्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्याने खोटा गुन्हा दाखल करून मला अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला होता. त्याला मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पोलीस चौकशी करुनच गुन्हे दाखल करतात. खोटे गुन्हे कोणावरही दाखल होत नाहीत. खडसेंवर अन्याय होत असेल तर त्यांनी कोर्टात जावं, असा सल्ला पाटील यांनी दिला आहे.
जळगावात मी अनेकांना अडसर ठरत आहे. त्यांना निवडणूका जिंकता येत नाहीत. त्यामुळे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचं षडयंत्र सुरू आहे. जामनेरच्या पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे षडयंत्र रचण्यात येत असल्याची माहिती मला एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. सध्या राज्यात सुडाचं राजकारण सुरू आहे. यापूर्वीही माझ्यासोबत असं झालं आहे. त्यामुळे मी अशा षडयंत्रांना घाबरणार नाही, असे खडसे यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी अन्याय होत असेल तर कोर्टात जावं असा सल्ला त्यांना दिला आहे.
अधिक वाचा : सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज; त्यांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही
तसेच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला दिलेल्या पत्रावर बोलताना ते म्हणाले, या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार हा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाचा आहे.