ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ठाकरे सरकारच्या नामांतराचा निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर आज शिंदे सरकारकडून पुन्हा औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्यात आले. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव कायम ठेवण्याला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया दिली आहे. नामांतराचं श्रेय घेण्यासाठीच ठाकरे सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आज शिंदे सरकारने पुन्हा या शहरांचं नामांतर केलं. आता त्यांनी महिनाभरात केंद्र सरकारकडून या निर्णयाला मंजूरी आणावी, अन्यथा त्यांना शहरात फिरु देणार नाही, असा इशारा खैरे यांनी दिला.
खैरे म्हणाले, 29 जून रोजी ठाकरे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक झाली होती. या बैठकीत औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. केवळ श्रेय घेण्यासाठी हा आक्षेप होता. त्यानंतर शिंदे सरकारने या निर्णयाला स्थगिती देत दोन दिवसात पुन्हा नामांतर केले. 1988 पासून आम्ही नामांतरासाठी आंदोलन करत आहोत. आता या निर्णयानंतर शिंदे सरकारनं केंद्रातून लवकर मंजुरी आणावी. त्याशिवाय आम्ही कोणताही आनंद साजरा करणार नाही. केद्रांची मान्यता मिळाल्यानंतरच आमचा जल्लोष असेल. सरकारनं एका महिन्यात मंजुरी मिळवावी, अन्यथा शहरात फिरु देणार नाही.
हेही वाचा : राज्यात पावसाचा जोर ओसरला
या नामांतराचं संपूर्ण श्रेय हे फक्त बाळासाहेबांना आहे. फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात हे नामांतर का केलं नाही? असा सवालही खैरेंनी यावेळी उपस्थित केला.