वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज खलिल अहमदने क्रिकेटच्या टी-20 प्रकारात 100 बळींचा टप्पा गाठला आहे. या स्पर्धेतील गुरूवारी झालेल्या मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाविरूद्धचा सामना खेळताना खलिल अहमदने हा टप्पा गाठला आहे.
या सामन्यात हैदराबाद संघातील मार्करेमला बाद करून खलिल अहमदने क्रिकेटच्या टी-20 प्रकारातील आपला 100 वा बळी नोंदविला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने 21 धावांनी जिंकला. दिल्ली कॅपिटल्सतर्फे या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि पॉवेल यांनी नाबाद अर्धशतके झळकविली. दिल्लीने या सामन्यात हैदराबादला 208 धावांचे आव्हान दिले. हैदराबाद संघाने 20 षटकांत 8 बाद 186 धावा जमविल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. दिल्ली संघातील खलिल अहमदने 3 तर शार्दुल ठाकुरने दोन गडी बाद केले. या स्पर्धेतील दिल्ली संघाचा 10 सामन्यातील हा पाचवा विजय आहे. या पराभवामुळे हैदराबाद संघाला स्पर्धेच्या गुणतक्त्यात सहावे स्थान मिळाले आहे. हैदराबाद संघाचा या स्पर्धेतील हा पाचवा पराभव आहे. या दोन्ही संघांनी आता प्रत्येकी 10 सामन्यात समान 10 गुण नोंदविले आहेत. पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने सरस धाव सरासरीच्या जोरावर पाचवे स्थान मिळविले आहे.