भारत नेपाळच्या संपर्कात : तिसऱ्या देशात न सोडण्याची विनंती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, काठमांडू
गेल्या आठ दिवसांपूर्वीपासून भारतीय तपास यंत्रणांना गुंगारा देत फरार झालेला खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग नेपाळमध्ये लपल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या अटकेसाठी भारतीय प्रशासकीय यंत्रणांनी नेपाळशी पत्रव्यवहार करत त्याला पकडण्याची विनंती केली आहे. तसेच त्याला कोणत्याही तिसऱ्या देशात पळून जाण्याची परवानगी देऊ नये आणि त्याने भारतीय किंवा इतर कोणत्याही बनावट पासपोर्टचा वापर करून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अटक करावी, अशी विनंती भारताने नेपाळ सरकारला केली आहे.
काठमांडू येथील भारतीय दुतावासाने सरकारी यंत्रणांना शनिवारी कॉन्सुलर सेवा विभागाला पाठवलेल्या पत्रात अमृतपाल सिंगने नेपाळमधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अटक करण्याची विनंती केली आहे. पत्राच्या प्रतीचा हवाला देत प्रसारमाध्यमांनी अमृतपाल सिंग सध्या नेपाळमध्ये लपल्याची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय दुतावासाने पाठविलेल्या पत्राची प्रत आणि अमृतपाल सिंग यांच्या वैयक्तिक तपशीलाची प्रत हॉटेल्सपासून एअरलाईन्सपर्यंत सर्व संबंधित एजन्सींना पाठवण्यात आली आहे. अमृतपाल सिंग 18 मार्चपासून फरार आहे. त्याच्याकडे वेगवेगळ्या ओळखींचे अनेक पासपोर्ट असल्यामुळे तो नामांतर किंवा वेशांतर करून अन्य देशांमध्ये पोबारा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.