वार्ताहर /रामनगर
बेळगाव-गोवा महामार्गावरील खानापूर-अनमोड रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असून बेळगावपासून खानापूरपर्यंतचे चौपदरीकरणाचे काम आता पूर्णत्वास आले आहे. परंतु खानापूरपासून अनमोडपर्यंतचे दुपदरीकरण अजूनही अर्धवट स्थितीत रखडले आहे. पूर्वीच्या ठेकेदाराने न्यायालयाच्या स्थगितीमुळे काम अर्धवट स्थितीत सोडून दिले आहे. तर आता न्यायालयाने खानापूर-अनमोड मार्ग करण्यासाठी हिरवा कंदील दाखविल्याने सदर अर्धवट असलेल्या कामाची पुन्हा टेंडर प्रक्रिया करून सदर टेंडर पुणे येथील एसएनपी व्हीव्हीसी नावाच्या कंपनीला देण्यात आले आहे. सदर कंपनीने टेंडर घेतल्यानंतर काही सामग्री मार्गावर आणून पूजा केली. परंतु रस्ता कामासाठी आणण्यात आलेले साहित्य तसेच ठेकेदाराचे कर्मचारीही दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे सदर रस्त्याचे काम घेतलेला ठेकेदार हरवलाय का? असा प्रश्न वाहनधारकांकडून विचारण्यात येत आहे.
आता पावसाला सुरुवात होणार असून अर्धवट कामामुळे सदर मार्ग पावसाळय़ात बंद होण्याची शक्मयता आहे. त्यापूर्वीच ज्या ठिकाणी वाहने अडकण्याची शक्यता असेल त्या ठिकाणी नव्याने मंजूर झालेल्या ठेकेदाराने याकडे लक्ष देण्याची मागणीही वाहनचालकातून होत आहे. सदर मार्गावरील ब्रिज अर्धवट स्थितीत असल्याने या ब्रिज वर आता मोठ-मोठी झाडे उगवली आहेत. काही दिवसांनंतर ती झाडे तोडण्यासाठी पुन्हा वनविभागाची परवानगी घेणे भाग पडणार आहे, असे नागरिकांतून सांगण्यात येत आहे.