काँग्रेस अध्यक्षपदासाठी के. एन. त्रिपाठी यांचा उमेदवारी अर्ज रद्द
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे दोनच उमेदवार सध्या शर्यतीत राहिले आहेत. झारखंडमधील नेते के. एन. त्रिपाठी यांचा उमेदवारी अर्ज छाननीत रद्द करण्यात आला आहे. 8 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. आता दोनच उमेदवार आमने-सामने असून उर्वरित चित्र 8 तारखेनंतर स्पष्ट होईल. कोणीही उमेदवारी मागे न घेतल्यास निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी झाल्यानंतर त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे दोनच उमेदवार रेसमध्ये असल्याचे शनिवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले. शुक्रवारी एकूण 20 अर्ज जमा झाले. यापैकी छाननी समितीने स्वाक्षरीची अडचण आल्याने 4 अर्ज नाकारले. के. एन. त्रिपाठी यांचा फॉर्म विहित निकषांची पूर्तता न केल्यामुळे नाकारण्यात आला. आता मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे काँग्रेस अध्यक्षपदाचे सध्याचे दोन दावेदार आहेत, असे ते पुढे म्हणाले.
विरोधी पक्षनेतेपदाचा खर्गे यांचा राजीनामा
काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱयाच दिवशी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.वास्तविक काँग्रेसमध्ये ‘एक व्यक्ती एक पद’ हे तत्त्व आहे. त्यानुसार खर्गे यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर फेबुवारी-2021 मध्ये खर्गे यांना राज्यसभेत विरोधी पक्षनेते बनवण्यात आले होते. आता खर्गे यांच्या जागी पी. चिदंबरम किंवा दिग्विजय सिंग राज्यसभेत येऊ शकतात, असे मानले जात आहे.
दिग्विजय सिंग, गेहलोत यांची माघार
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांचीही नावे काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. राजस्थान काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अशोक गेहलोत यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. दुसरीकडे, दिग्विजय सिंग यांनी शुक्रवारी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अंतिम क्षणी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती.