राजकोट / वृत्तसंस्था
शनिवारपासून येथे सुरू झालेल्या इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात शेष भारत संघाने सौराष्ट्रचा पहिल्या डावात 98 धावांत खुर्दा करून दिवसअखेर 3 बाद 205 धावा जमवित 107 धावांची आघाडी मिळविली. शेष भारत संघातील सर्फराज खानने शानदार नाबाद शतक (125) तर कर्णधार हनुमा विहारीने नाबाद अर्धशतक (62) नोंदवून चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 187 धावांची भागीदारी केली.
रणजी विजेता सौराष्ट्र आणि शेष भारत यांच्यात हा इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेचा पाच दिवसांचा खेळविला जात आहे. शेष भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर सौराष्ट्रचा पहिला डाव 24.5 षटकात 98 धावांत आटोपला. शेष भारत संघातील मुकेश कुमार, कुलदीप सेन आणि उमरान मलिक यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. मुकेश कुमारने 23 धावांत 4, कुलदीप सेनने 41 धावांत 3 तर उमरान मलिकने 25 धावांत 3 गडी बाद केले. सौराष्ट्राच्या डावामध्ये केवळ 4 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. अर्पित वासवदाने 4 चौकारांसह 22, धर्मेंद्रसिंह जडेजाने 6 चौकारांसह 28, कर्णधार उनादकटने 2 चौकारांसह 12 आणि चेतन साकरियाने 2 चौकारांसह नाबाद 13 धावा जमविल्या.
त्यानंतर शेष भारत संघाने दिवसअखेर पहिल्या डावात 49 षटकात 3 बाद 205 धावा जमविल्या. सर्फराज खानने शानदार फलंदाजी करत 126 चेंडूत 2 षटकार आणि 19 चौकारांसह नाबाद 125 तर कर्णधार हनुमा विहारीने 145 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 62 धावा झळकविल्या. या जोडीने तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 187 धावांची भागीदारी करून आपल्या संघाला 107 धावांची आघाडी मिळवून दिली.
तत्पूर्वी शेष भारताच्या पहिल्या डावालाही चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचे सलामीचे तीन फलंदाज केवळ 18 धावांत तंबूत परतले होते. सलामीच्या ईश्वरनला आपले खाते उघडता आले नाही. मयांक अगरवालने 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. यश धूल 6 धावावर बाद झाला होता. सौराष्ट्रतर्फे कर्णधार उनादकटने 47 धावांत 2 तर साकारियाने 50 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – सौराष्ट्र प. डाव 24.5 षटकात सर्वबाद 98 (वसवडे 22, धर्मेंद्रसिंह जडेजा 28, उनादकट 12, साकरिया नाबाद 13, मुकेश कुमार 4-23, कुलदिप सेन 3-41, उमरान मलिक 3-25), शेष भारत प. डाव 49 षटकात 3 बाद 205 (सर्फराज खान खेळत आहे 125, हनुमा विहारी खेळत आहे 62, अगरवाल 11, यश धूल 5, ईश्वरन 0, उनादकट 2-47, साकारिया 1-50).