ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीतील सदस्यांनी एका व्यावसायिकाचे आणि त्याच्या मित्राचे अपहरण करुन त्यांच्याकडे 20 कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मारणे टोळीतील चार जणांना अटक केली आहे.
गज्या उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे (रा.शास्त्रीनगर, कोथरुड), सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप (रा.धनकवडी), अमर शिवाजी किर्दत (रा. कोडोली, सातारा), हेमंत बालाजी पाटील (रा. पलुस, सांगली), फिरोज महंमद शेख (रा. समर्थनगर कोडोली, सातारा), एक अनोळखी महिला आणि त्यांचे इतर तीन ते चार साथीदार यांच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील घोलप, पाटील, किर्दत आणि शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर गजा मारणे फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
अधिक वाचा : ठाकरेंनी पाठवलेली चिन्हे आयोगाच्या यादीत नाहीत!
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यावसायिक यांचा जमीन खरेदी विक्री आणि शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. शुक्रवारी ते त्यांच्या मित्राबरोबर कात्रज येथील आयसीआयसीआय बँकेजवळ थांबले होते. त्यावेळी काही अनोळखी व्यक्तींनी त्यांचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवले. गाडी मुंबई-बेंगळूर महामार्गावर नेली. तिथून रात्रभर वेगवेगळ्या गाडीत बसवून त्यांच्यावर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादींची गाडी जबरदस्तीने काढून घेत 20 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली, पैसे न दिल्यास तक्रारदार व त्यांचे कुटुंबीय यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांना यासंदर्भात माहिती मिळाली. त्यांच्या पथकाने व्यावसायिक आणि त्यांच्या मित्राची सुखरुप सुटका करुन मारणे टोळीवर गुन्हा दाखल केला.