सांगोल्यातील दांम्पत्याला केले अटक; कोल्हापूर पोलिसांनी 48 तासात लावला छडा
कोल्हापूर प्रतिनिधी
आदमापूर येथून अपहरण झालेल्या 6 वर्षाच्या बालकाची कोल्हापूर पोलिसांनी केवळ 48 तासात सुखरुप सुटका करत आईच्या ताब्यात दिले. मुल होत नसल्याच्या कारणातून सांगोला येथील दांम्पत्याने या बालकाचे अपहरण केले होते. या प्रकरणी मोहन अंबादास शितोळे (वय 50), छाया मोहन शितोळे (वय 30 रा. जवळा ता. सांगोला जि. सोलापूर) अशी त्यांची नावे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या गुह्याचा तपास करणाऱ्या पथकास 25 हजार रुपयांचे बक्षीसही त्यांनी जाहिर केले.
सातारा येथील सुषमा नाईकनवरे (रा. खंडाळा जि. सातारा) या 6 वर्षाच्या मुलासह 3 मार्चपासून आदमापूर येथील बाळूमामा मंदिरामध्ये देवदर्शनाकरिता आल्या होत्या. येथील भक्तनिवासमध्ये त्या थांबल्या होत्या. 4 मार्च रोजी सकाळी 8 वाजता त्या आंघोळीसाठी गेल्या असता त्यांच्या 6 वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. मुलगा मिळत नसल्याने त्यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तत्काळ दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी या तपास प्रकरणी 7 पथकांची नेमणूक केली. दुचाकीवरुन आलेल्या एका दांम्पत्याने हे अपहरण केल्याची माहिती तपासात समोर आली.
100 सिसीटीव्हींची तपासणी पोलिसांच्या आदमापूर येथील एका हॉटेलमधील सिसीटीव्ही फुटेज हाती लागले. यामध्ये एका दुचाकीवरुन 50 वर्षाचा पुरुष व 30 वर्षाची महिला बालकास घेवून निघाल्याचे दिसले. यावरुन पोलिसांनी परिसरातील सिसीटीव्ही फुटेजचा तपास केला. भुदरगड येथून निपाणी, चिक्कोडी, अंकली, चिंचणी मायाक्कामार्गे मिरजकडे हे दांम्पत्य मुलास घेवून गेल्याचा माग पोलिसांना लागला. या मार्गावरील जवळपास 100 हून अधिक सिसीटीव्हीची तपासणी पोलिसांनी केली. दुचाकीचा नंबरही पोलिसांच्या हाती लागला. या नंबरवरुन मोहन शितोळे व छाया शितोळे या दोघांनी हे अपहरण केल्याचे समोर आले.
जवळा (ता. सांगोला) येथून अटक
दुचाकीच्या नंबरवरुन संशयीतांचा पत्ता सांगोला येथील असल्याचे निदर्शनास आले. मात्र प्रत्यक्षात पोलीस त्या ठिकाणी पोहोचले असता तेथे शितोळे दांम्पत्य नव्हते. यानंतर पाच ते सहा ठिकाणी छापेमारी केल्यानंतर या दोघांना जवळा (ता. सांगोला) येथून अटक करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली. आटपाडी येथे हे दांम्पत्य पुर्वी राहत होते. मात्र पाण्याच्या त्रासामुळे जवळा येथे या दोघांनी भाड्याने घर घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
मुल नसल्याने अपहरणाचे कृत्य
मोहन व छाया या दोघांनीही दुसरे लग्न केले आहे. मोहनची पहिली पत्नी मयत आहे तर छायाचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या दोघांनाही अपत्य नसल्यानेच त्यांनी मुलाचे अपहरण केल्याची कबूली दिली.
25 हजारांचे बक्षीस
संवेदनशील असणाऱ्या या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस प्रमुखांनी 7 पथकांची नेमणूक करण्यात आली. यामध्ये गडहिंग्लज उपविभागाचे उपअधिक्षक राजीव नवले, सहाय्यक निरीक्षक प्रशांत पाटील, उपनिरीक्षक युवराज जाधव यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे, उपनिरीक्षक विनायक सपाटे, अंमलदार सुरेश पाटील, रणजित पाटील, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, तुकाराम राजीगरे, अजय काळे, संजय पडवळ, अनिल जाधव, सारीका मोटे यांनी ही कामगिरी केली. पोलीस अधिक्षकांनी या तपास पथकास संयुक्तीक 25 हजाराचे बक्षीस जाहिर केले.
मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा
गेल्या काही दिवसांपासून राज्यात लहान मुले पळविणाऱ्या टोळीने धुडगुस घातला आहे. काही ठिकाणी या अफवा असल्याचे समोर आले. अशाच प्रकारच्या टोळीनेच अपहरण केल्याची अफवा पसरली होती. मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करुन 6 वर्षाच्या मुलाची सुखरुप सुटका केली.