अपघातांच्या वाढत्या घटना : वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी, आंदोलन करण्याचा इशारा
वार्ताहर /किणये
किणये रस्ता सध्या धोकादायक बनला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून स्थानिक नागरिकांना ये- जा करणे मुश्कील बनले आहे. पिरनवाडीपासून ते किणयेपर्यंतच्या रस्त्यावर अपघातांच्या घटना घडत आहेत. या रस्त्यावरून गोव्याला ये-जा करणाऱया वाहनधारकांची संख्या सध्या वाढली आहे. त्यामुळे बरीच वाहने सुसाट धावतात. याचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
गोव्याला ये-जा करण्यासाठी बेळगाव व इतर परिसरातील वाहनधारक बेळगाव चोर्लामार्गे किणये रस्त्यावरून अधिक प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनधारकांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ दिसून येते. हे वाहनधारक वेगावर नियंत्रण ठेवत नाहीत आणि त्यामुळे स्थानिक वाहनधारक किंवा चालत जाणाऱयांना मात्र आपला जीव मुठीत घेऊनच जावे लागते.
यापूर्वी या रस्त्यावर अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. काही तरुणांचे जीवही गेले आहेत. तसेच किणयेजवळील पुलावर येत असताना वाहनांच्या धडकेत जनावरेही मृत्युमुखी पडलेली आहेत. त्यामुळे आता हा रस्ता काही जणांसाठी गोव्याला वाहतूक करण्याकरिता सोयीचा वाटला तरी या भागातील लोकांना मात्र धोकादायक बनू लागला आहे, अशी माहिती दिली आहे.
रस्त्यावरील पिरनवाडी ते किणयेपर्यंतच्या टप्प्यावर कित्येक अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये आजूबाजूच्या गावातील तरुणांचा बळी गेला आहे. आठ ते दहा दिवसातून या रस्त्यावर किमान एक तरी गंभीर किंवा किरकोळ अपघात हा घडलेला असतो. हे अपघात घडण्यामध्ये मुख्य कारण असे आहे की गोव्यावरून ये-जा करणारी वाहने ही सुसाट धावतात आणि त्यामुळेच अपघातांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
किणये, बहाद्दरवाडी क्रॉस, नावगे या परिसरात अनेकप्रकारची विविध सारकारी कार्यालये, शाळा, कॉलेजीस आहेत. गावे आहेत. त्यामुळे या भागात नागरिकांची नेहमी वर्दळ असते. मात्र शाळा किंवा गाव असलेल्या रस्त्यावरून येणाऱया वाहनधारकांच्या वेगावर मात्र नियंत्रण नसतेच. अशा वाहनचालकांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
या भागातील शेतकरी आपली जनावरे, बैलजोडी घेऊन याच रस्त्यावरून जात असतो. मात्र यापूर्वी किणयेजवळ शेतकऱयांना आपली जनावरे गमवावी लागली आहेत. तसेच काही शेतकऱयांच्या बैलगाडीलाही अपघात झालेले आहेत. या घटना वारंवार होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या भागात गस्त घालावी आणि जी वाहने सुसाट आणि प्रशासनाच्या नियमाचे उल्लंघन करतात, अशा वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या रस्त्यावर आता अपघातांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. वेगावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. या भागात आंदोलन करू, असा इशारा आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी दिला आहे.