ऑनलाईन टीम / तरुण भारत :
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट घोटाळा प्रकरणाची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. ईडीने 26 मे रोजी परब यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला होता. यामध्ये परब यांना जमीन विकणारे व्यावसायिक विभास साठे यांच्या निवासस्थान, कार्यालयाचाही समावेश होता. त्यामुळे परब हे साठे यांच्यावर दडपण आणण्याची शक्यता असून, साठेंच्या जीवाला धोका आहे. त्यांचा ‘मनसुख हिरेन’ होऊ नये, म्हणून पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवावी, असे पत्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना लिहिलं आहे.
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. या घोटाळ्यासंबंधी अनेक तपास यंत्रणा / संस्थांनी, तसेच पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांनी अनिल परब आणि त्यांच्या साई रिसॉर्ट एनएक्सवर कारवाई करण्याचा ही निर्णय घेतला आहे. परब यांनी मे 2017 मध्ये विभास साठे यांच्याकडून दापोलीतील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील जमीन घेतली. तसेच तिथे लॉकडाऊन काळात फसवणूक करत अनधिकृतपणे रिसॉर्ट बांधला. मी यासंदर्भातील घोटाळा बाहेर काढल्यामुळे आता परब अडचणीत आले आहेत. या रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. साठे यांचे ‘मनसुख हिरेन’ होऊ नये. साठे यांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी,अशी विनंती सोमय्या यांनी या पत्रातून केली आहे.