न्यायाधीश सायोनारा लाड यांचे मत
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात मुलामुलींची तस्करी होते. घरातून शाळेसाठी मुले निघाली की बाहेर जाऊन मुले काय करतात याबद्दल पालकांना माहिती नसते. उच्चभ्रू जीवनशैली, आर्थिक परिस्थिती तसेच प्रेम प्रकरण यातून जास्त प्रमाणात तस्करी होण्याची शक्यता वर्तविली जाते. मुलांची तस्करी थांबविणे गरजेचे आहे. याशिवाय मुलांना तस्करीबाबत जागरूक करणे आणि त्यांचे योग्यरित्या पोषण होणे आवश्यक आहे. आपली मुले चांगल्या वातावरणात आहेत की नाही याविषयाची जाण प्रत्येक पालकाने ठेवणे गरजेचे असल्याचे मत बाल न्यायालयाच्या अध्यक्ष न्यायाधीश सायनोरा टेलेस लाड यांनी पणजीत महिला व बाल कल्याण संचालनालय व गुज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुयल ऑफेन्सेस पोक्सो ऍक्ट 2012 आणि गोवा बाल कायदा 2003वर प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर आयोजित केलेल्या जागृती कार्यशाळेत बोलताना व्यक्त केले.
सध्याच्या युगात आवडीनुसार ऑनलाईन ऑर्डर करून जेवण मागविले जाते. त्यामुळे मुलांचे योग्यरित्या पोषण होत नाही. आवडत्या गोष्टीसाठी कुठल्याही लोभात मुले सहजरित्या फसले जातात. पैशांचे लोभ दाखवून मुलांना पळविले जाते किंवा त्यांना मनोरंजनाकरिता, भीक मागण्याकरिता वापर केला जातो. सध्या बालशोषणाची प्रकरणे वाढत आहेत. विविध ठिकाणी हे शोषण होत आहे. या शोषणाचे बळी काहीजण प्रेमप्रकरणातूनही होतात. आजच्या चित्रपटातून दाखविण्यात येणाऱया अश्लीलता, तसेच इतर गोष्टीचे आकर्षण आपोआपच मुलांना होते आणि त्याप्रमाणे वैयक्तिक जीवनात ते करायला सुरू करतात. सध्या तर अशा परिस्थितीमुळे 14 वर्षाची मुली गरोदर होत आहेत. काहींना तर माहितीही नसते की आपण गरोदर आहोत. शोषित मुलांना सुधारगृहात पाठविले जाते. त्याठिकाणी कलात्मक गोष्टी केल्या जातात. गोव्यात एकूण 49 नोंदणीकृत सुधारगृह आहेत. शोषणाबाबतीत शाळेत, कॉलेजमध्ये याविषयी प्रसारमाध्यमांद्वारे जागृती करणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांना मोकळीक देऊन त्यांच्याकडे मैत्रीपूर्ण नाते ठेवावे असा सल्ला लाड यांनी यावेळी दिला.
सायोनारा लाड यांच्या व्याख्यानापूर्वी आयजी प्रिझन आणि डिआयजी बॉस्को बी.एफ. जॉर्ज यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण संचालनालयाच्या संचालिका दिपाली नाईक, सहसंचालिका संगीता परब, गुजचे अध्यक्ष राजतिलक नाईक, बालन्यायालयाच्या अध्यक्ष सायोनारा लाड, स्कॅन गोवाचे सहसंचालक एमिडियो पिंटो उपस्थित होते. दिपाली नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर आभार संगीता परब यांनी मानले.
यावेळी स्कॅन गोवाचे सहसंचालक एमिडियो पिंटो यांनीही मार्गदर्शन केले. बालशोषण हे सर्वत्र होते. विशेषतः शिक्षितांकडून बालशोषण केले जाते. फक्त मुलीच नाहीतर मुलेही बालशोषणाचे बळी पडतात. गोव्यात 59 टक्के मुलींचे तर 41 टक्के मुलांचे शोषण होते. विशेषतः 11 ते 15 वर्षांच्या मुलांमध्ये शोषण जास्त प्रमाणात होते. त्यामुळे या वयोगटातील मुलांना जास्त जपणे गरजेचे आहे. मुलींपुरते मर्यादित न राहता मुलांचेही सशक्तीकरण करणे गरजेचे असल्याचे पिंटो यांनी सांगितले.