सोशल मीडियाद्वारे अनेकांची ओळख, प्रत्यक्ष भेटीनंतर अनेकवेळा ताटातूट : पालकांनीच दक्ष राहण्याची गरज
संजय खुळ/इचलकरंजी
सोशल मीडियाच्या माध्यमातून युवक-युवतींची ओळख होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच नियमितपणे होणारे चॅटिंग आणि प्रेमाच्या गोष्टी यातून एकमेकांच्या बद्दल आकर्षण वाटते. परंतु प्रत्यक्षात भेटल्यानंतर मात्र कधी तिचा तर कधी त्याचा अपेक्षाभंग होतो. काही वेळा सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोवरून तर काही वेळा घरच्या परिस्थितीवरून फसगत होते आणि आयुष्याची पाहिलेली स्वप्नेच उद्ध्वस्त होऊन जातात.
इचलकरंजी बस स्थानकावर दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेवरून अनेक वास्तववादी माहिती पुढे आली आहे. पोलिसांच्या मते काही वेळा या प्रकरणाची नोंद होते तर अनेक वेळा परस्पर या प्रकरणात तडजोड काढून कुटुंबातील व्यक्ती पुढे जातात. परंतु या सर्व प्रकारात आजचे तरुण-तरुणी मोठय़ा प्रमाणात फसत आहेत, हेच वास्तव पुढे येत आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या वास्तवावरून आपण कितपत पुढे पाऊल टाकायचे याबाबत आजच्या युवा पिढीने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
इचलकरंजी शहरात दोन दिवसांपूर्वी बस स्थानकावर फसगत झालेल्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खरे तर अशी प्रकरणे अनेक कुटुंबांच्या बाबतीत घडतात. परंतु त्याची नोंदच होत नाही. इचलकरंजीत असलेली तरुणी असहाय्य बनल्यामुळेच तिला पोलिसांची मदत घ्यावी लागली. परंतु अनेक प्रकरणात मात्र मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांच्या सहाय्याने मार्गक्रमण काढून तो किंवा ती या परिस्थितीतून सुटकारा करतात.
अनेकवेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटणं आणि प्रत्यक्षात भेटणं यावरूनच दोघांच्या काही महिन्यांच्या प्रेमाच्या प्रकरणाला तडा जातो. पोलिसांच्या मते अलीकडच्या काळात मोबाईलचा अधिक वापर सुरू झाल्यानंतर अशा प्रकरणात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. काही वेळा अठरा ते एकवीस वर्षांपेक्षा कमी असणारे युवक-युवतीही अशा माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात येतात. परिस्थितीची कोणतीही जाणीव नसलेली ते किंवा ती जेव्हा एकमेकांना भेटतात त्यातील कोणीतरी पुढील आयुष्यासाठी स्पष्टपणे नकार देतो आणि त्याच ठिकाणी मोठा पेच प्रसंग निर्माण होतो.
अनेकवेळा दोघेजण ही कुटुंबाच्या संपर्कात न राहता आज्ञातस्थळी जातात. त्यावेळी मात्र कुटुंबांची मोठी घालमेल होते. मात्र या परिस्थितीशी जाणीव हे अनेक वेळा त्या दोघांनाही नसते. पोलिसांपर्यंत आलेल्या अनेक प्रकरणात एक-दोन दिवस एकमेकांच्या सहवासात राहिल्यानंतर अनेकवेळा एकमेकांशी फारकत घेतात. त्यावेळी कधीतरी ती नाही तरी कधीतरी तो मोठय़ा संकटात येतो.
सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ एकमेकांचे फोटो पाहिलेले असतात. प्रत्यक्षात भेट झाल्यानंतर असलेले व्यक्तिमत्त्व यामुळेही अनेक वेळा अशा प्रकरणात तडा जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या सर्व प्रकारात कधी तिची होणारी फसवणूक किंवा कधी त्याची होणारी फसवणूक आणि होणारी ताटातूट असे प्रकार अलीकडच्या काळात पहावयास मिळत आहेत. त्यामुळे कुटुंबीयांनीच आपल्या पाल्यावर वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
मोकळीकतेचा गैरफायदा
आजच्या युवा पिढीला अनेक पालक मोकळीक देत असतात. याच परिस्थितीचा फायदा आजची युवा पिढी घेत आहे. पुढील वास्तववादी जीवनाचा विचार न करता आणि आपल्या कुटुंबावर येणाऱया प्रसंगाची चिंता न करता दोघेही आपला मार्ग स्वीकारतात. परंतु अनेक वेळा फसगत झाल्यानंतर पश्चाताप होत असल्याचेच अनेक प्रकरणात दिसून येते.
– अर्चना मगदूम, सामाजिक कार्यकर्त्या