वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताचा माजी कर्णधार आणि भरवशाचा फलंदाज विराट कोहलीने आठवे स्थान मिळविले आहे. या यादीत भारताच्या ईशान किशनने 37 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
बांगलादेश विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत कोहलीने तब्बल तीन वर्षांनंतर शतक झळकविले होते. तसेच या स्पर्धेत ईशान किशनने जलद द्विशतक नोंदविले. या मालिकेतील तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात कोहलीने 91 चेंडूत 113 धावा तर डावखुऱया ईशान किसन 131 चेंडूत 210 धावा झोडपल्या होत्या. भारताचा आणखी एक फलंदाज श्रेयस अय्यरने या मानांकन यादीत 15 वे स्थान मिळविले आहे. त्याचे मानांकन 5 अंकांनी वधारले आहे.
आयसीसीच्या वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताचा मोहम्मद शिराज 22 व्या स्थानावर आहे. बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसनने 8 वे स्थान तर अष्टपैलूंच्या मानांकन यादीत बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजने तिसरे स्थान मिळविले आहे. आयसीसीच्या कसोटी मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाचा लाबुशेनने आपले आघाडीचे स्थान अधिक भक्कम करताना 937 मानांकन गुण मिळविले आहेत. विंडीज विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत लाबुशेनने 3 शतके झळकविली. त्यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे. या यादीत ऑस्टेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसऱया स्थानावर असून कोहली 12 व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा हेड सातव्या स्थानावर तसेच भारताचा रोहित शर्मा दहाव्या स्थानावर आहे.