दयानंद स्वामीजींचा पुढाकार
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह विविध राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकटनूर, ता. अथणी येथील यल्लम्मादेवी जत्रेत प्राणीहत्या रोखण्यात यश आले आहे. पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने प्राणीहत्या रोखण्यात आल्याची माहिती विश्व प्राणी कल्याण मंडळ व बसव धर्म ज्ञानपीठाचे दयानंद स्वामीजींनी दिली.
स्वामीजींनी यासंबंधी शनिवारी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्राणीहत्या रोखण्यासाठी स्वामीजींनी जत्रेच्या काळात कोकटनूर व पंचक्रोशीतील गावात जागृतीची मोहीम हाती घेतली. जत्रेत कोंबडी, बकरी आदी मुक्या प्राण्यांचा बळी दिला तर प्रशासनाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
या कामी पोलीस व जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य केले. मंदिर परिसरात व पंचक्रोशीतील गावात बळी देण्यासाठी आणलेली शेकडो बकरी पोलिसांनी ताब्यात घेतली. हे प्राणी पशुसंगोपन खात्याच्या ताब्यात देण्यात आले. काही जणांनी पोलिसांना चकवून प्राण्यांसह तेथून पळ काढला. यल्लम्मा देवीच्या मंदिरासमोर प्राणी बळी देण्यास संधी देण्यात आली नाही.
बसव धर्म ज्ञानपीठाचे अध्यक्ष दयानंद स्वामीजी, महिला संचालक सुनंदादेवी आदींनी अहिंसा, प्राणीदया, आध्यात्मिक संदेश यात्रा सुरू केली होते. सततची जागृती व प्रशासनाची खबरदारी यामुळे प्राणीहत्या रोखण्यात यश आले. मंदिरात किंवा मंदिरासमोर प्राणीहत्या करून, त्यांचे रक्त सांडून मंदिराचे पावित्र्य नष्ट करू नये, असे आवाहन स्वामीजींनी केले आहे.