उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंच्या उलट भुमिका; जिल्हाधिकाऱ्यांसोबत कास परिसरातील अतिक्रमणांची करणार पाहणी
कास परिसरात असलेले डोंगर, तिथली झाडी जपली गेली पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे. तिथल्या स्थानिकांची बांधकामे पहा आणि बाहेरुन आलेल्यांची बांधकामे बघा. ज्यांनी बांधकामाची परवानगी घेतली नाही. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी विनंती खासदार उदयनराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे दि. 4 रोजी खासदार उदयनराजेंच्या सोबत कास परिसरातील अतिक्रमणे पहायला जाणार आहेत, अशी माहितीही उदयनराजेंनी दिली. तसेच शिवेंद्रराजेंनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याबाबत छेडले असता उदयनराजे म्हणाले, अधिकाऱ्यांना आरोरावी करत असाल तर ते अनधिकृत बांधकामे पाडणारच, अशा शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली.
सध्या गाजत असलेल्या कास पुष्प पठारावरील बांधकामाच्या अनुषंगाने खासदार उदयनराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ऍड. भरत पाटील यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, “डोंगराळ, दुर्गम असणाऱ्या पाटण, कास, महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी लोकांना उदरनिर्वाह मिळत नव्हता. त्यामुळे फार वर्षापासून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड अशा वेगवेगळ्य़ा ठिकाणी गेले. तेथे त्यांना रोजगार मिळाला. ते जर गेले नसते तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असती. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एकमेव हिलस्टेशन आहे. त्यात मधला कासचा रस्ता झाल्यामुळे कास पुष्प पठाराला महत्व आले आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना एकच विनंती केली. महाबळेश्वर, पाचगणी येथील नागरिकांची एफएसआय वाढवून मिळावा अशी आहे. तिथल्या कुटुंबांची वाढ झाली आहे. आज नोकऱ्या मिळत नाहीत. पर्यटनवाढीला चालना द्यायची झाली तर जे लोक तिथे येतात त्यांना रात्री मुक्कामी राहणार असल्याने त्यांची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. ते करत असताना एक आराखडा तयार करण्यात यावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.”