गारगोटी/प्रतिनिधी
पाऊस व पुरामुळे गेली दहा दिवस वाघापूरचा पाणी पुरवठा बंद होता. नदीतील मोटार बंद असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली होती. मात्र तब्बल तीन तास पुराच्या पाण्यात राहून चार युवकांनी जीव धोक्यात घालून पाणीपुरवठा सुरळीत केला.
वाघापूर या भुदरगड येथील गावाला तीन्ही बाजुने नदी आहे. मात्र ग्रामस्थांना पाणी समस्येला सातत्याने तोंड द्यावे लागते. गेली कित्येक वर्षे एक दिवसाआड गावाला पाणी पुरवठा केला जातो.
मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. दहा दिवसांपासून गावातील पाणी पुरवठा बंद झाला होता. पाणी उपसा करणाऱ्या मोटारी पुरातील पाण्यात अडकून पडल्याने व स्वयंचलीत यंत्रणा कार्यान्वित नसल्याने मोटारी सुरू होत नव्हत्या. त्यामुळे पुराच्या पाण्यात जाणार कोण व मोटारी सुरू करणार कोण असा गंभीर प्रश्न उभा होता.
यावेळी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत पुराच्या पाण्यात माजी उपसरपंच बाजीराव जठार, राजेंद्र भोई, बाबासाहेब ऊर्फ पिंटू भोई, एकनाथ बरकाळे यांनी पाण्यात जाऊन मोटारी सुरू करण्याचे शिवधनुष्य उचलले. त्याला गावातीलच दहा बारा युवकांनी व ग्रामपंचायत प्रशासनाने सहकार्य केले. जोराचा वारा व पाण्याचा प्रचंड वेगाशी टक्कर देत तीन तासांच्या अथक परिश्रमाने मोटारी सुरू केल्या. दहा दिवसांनी पाणी आल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केलं तर या धाडसाबद्दल ग्रामस्थांमधून युवकांचे कौतुक होत आहे.