विकासापासून वंचित वस्त्यांना मिळणार 39 कोटींचा निधी : प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी वंचित वस्त्यांना दिले प्राधान्य : बृहत आराखडय़ानुसार निधीचे वितरण
प्रतिनिधी/कोल्हापूर
समाजकल्याण विभागाच्या निधी वितरणाचा विषय जिल्हा परिषदेच्या सभागृहात नेहमी गाजतो. माझ्या जिल्हा परिषद गटात कमी निधी दिला, इतर सदस्यांना जास्त निधी दिला, अशा अनेक कारणांवरून आजतागायत अनेक सर्वसाधारण सभा गाजल्या आहेत. पण प्रशासक संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समाजकल्याण समिती सभेत ज्या गावातील दलित वस्त्यांना गेल्या पाच वर्षात निधीच मिळालेला नाही, अथवा कमी निधी मिळाला आहे, अशा जिह्यातील 873 वस्त्यांना प्राधान्याने निधी देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे 39 कोटी 7 लाख निधीतून या वस्त्यांमधील बहुतांशी विकासकामे मार्गी लागणार आहेत.
प्रशासक संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समाजकल्याण समिती सभा पार पडली. यावेळी समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते. सभेतील निर्णयाबद्दल माहिती सांगताना प्रशासक चव्हाण म्हणाले, अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करण्यासाठी सन 2018-19 ते 2022-23 या 5 वर्षाचा बृहत आराखडा तयार करुन सन 2011 च्या जनगणनेनुसार अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सुविधा पुरविल्या जात आहेत. शासन निर्देशानुसार प्रथम वंचित वस्त्यांना निधी देणे, त्यानंतर कमी लाभ दिलेल्या वस्त्यांना लाभ देण्याबाबत स्पष्ट निर्देश आहेत.
कोल्हापूर जिल्हयात 1025 ग्रामपंचायतीमध्ये एकूण 1204 गांवे असून त्यामध्ये 2469 अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांची संख्या आहे. बृहत आराखडय़ाचे हे शेवटचे वर्ष असल्याने मार्चमध्ये प्राप्त झालेल्या 1 कोटी 90 लाखातून ज्या गावातील कोणत्याही वस्तीला लाभ मिळाला नाही, त्या गावातील 95 वस्त्यांना लाभ दिला होता. सन 2022-23 साठी या योजनेंतर्गत 39 कोटी 7 लाख 92 हजार लाख इतका निधी प्राप्त झाला आहे. बृहत आराखडयाचे शेवटचे वर्ष असल्याने कोल्हापूर जिल्हयातील सर्व तालुक्यातील गट विकास अधिकाऱयांकडून वंचित वस्त्यांची यादी व कमी लाभ दिलेल्या वस्त्यांची यादी मागविण्यात आली होती. त्यानुसार 686 वंचित वस्त्या व 187 पात्र कमी लाभ दिलेल्या वस्त्यांची अशी एकूण 873 वस्त्यांची यादी सर्व गट विकास अधिकाऱयांकडून प्राप्त झाली. सदर यादीतील वस्त्या लाभासाठी पात्र आढळून आल्यामुळे समाज कल्याण समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तालुकानिहाय निधी उपलब्धतेनुसार 873 वस्त्यांना तरतूद उपलब्ध केली आहे.
पाच वर्षात बृहत आराखडय़ातील सर्व गावांना निधी
बृहत आराखडय़ानुसार कोल्हापूर जिल्हयातील सर्व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांना या योजनेतंर्गत लाभ देण्यात आल्याचे समाजकल्याण अधिकारी घाटे यांनी सांगितले. राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात पहिल्यांदाच बृहत आराखडयातील सर्व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांना लाभ दिला असल्याचे घाटे यांनी स्पष्ट केले.
157 दुर्गम शाळांमधील विद्यार्थ्यांना दिली जाणार सायकल
जिल्हयातील दुर्गम भागातील 157 शाळांमधील मागासवर्गिय पात्र मुला- मुलींना सायकल देण्यासाठी 10 लाखांची तरतूद केली आहे, असे प्रशासक चव्हाण यांनी सांगितले.