ओबीसी महिलांसाठीच अडीच वर्ष राहणार महापौरपद आरक्षित; 11 प्रभागात महापौरपद डोळ्य़ासमोर ठेऊन इच्छुकांकडून फिल्डींग; प्रथम संधी मिळण्यासाठी धडपड
विनोद सावंत कोल्हापूर
राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण कायम राहिल्याने कोल्हापूर महापालिकेचे अडीच वर्ष महापौरपद ओबीसी महिलांसाठीच आरक्षित असणार आहे. सध्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत जाहीर झाली असून 11 प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहेत. यामध्येच महापौरपदासाठी रस्सीखेच होणार यात शंका नाही.
वास्तविक कोल्हापूर महापालिकेचे 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत नवीन सभागृह अस्तित्वात येवून नवीन पदाधिकारीही निवड होणे अपेक्षित होते. परंतू कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली. याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेची ओबीसी शिवाय निवडणूक प्रक्रिया सुरू केली. यानुसार आरक्षण सोडतही काढण्यात आली होती.
दरम्यान, राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील महापालिकेतील महापौरपदाची आरक्षण सोडत काढली होती. यामध्ये कोल्हापूर महापालिकेसाठी पहिल्या अडीच वर्ष ओबीसी महिलांसाठी महापौरपद आरक्षित झाले होते.. परंतू राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने महापौरपदाबाबत साशक्ता निर्माण झाली होती.
महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी बांठिया आयोगाची नियुक्ती केली. त्यांनी राज्यातील ओबीसीचा सर्व्हे करून अहवाल तयार केला. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर पुन्हा ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय झाला. यामुळे कोल्हापूर महापालिकेचे नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर पहिले अडीच वर्ष महापौरपद पुन्हा ओबीसी महिलांसाठी आरक्षित असणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.ठ
प्रभाग रचना बदलली तरी महापौरपद ओबीसीकडेच
सध्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार 92 पैकी 11 प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहेत. या प्रभागामधील उमेदवारांनाच महापौरपदाची संधी असणार आहे. शिंदे सरकार प्रभाग रचना पुन्हा बदलण्याच्या तयारीत आहे. त्रिसदस्यीय प्रभाग रचनेऐवजी द्विसदस्यीय किंवा चार सदस्यीय प्रभाग रचना होणार अशी जोरदार चर्चा आहे. हा निर्णय झाल्यास नव्याने आरक्षण सोडत निघणार आहे. मात्र, एाबीसी महिलांसाठी महापौरपद असणार हे निश्चित आहे. सध्याच्या प्रभाग रचनेनुसार 11 प्रभागामध्ये ओबीसी महिलांना संधी आहे. प्रभाग रचनेत बदल झाल्यास ओबीसी महिलांची केवळ प्रभाग संख्या कमी जास्त होईल.
सत्तेवर ठरणार महापौर
महापालिकेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट विरूद्ध भाजप-ताराराणी आघाडी आणि शिंदे गट असाच सामना रंगणार असे सध्या तर चित्र आहे. सहाजिकच ज्या पक्षाची सत्ता येणार त्याचा महापौर होणार. महापालिकेत कोणाची सत्ता येणार हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. त्यामुळे कोणत्या पक्षातून निवडणूक लढवावी याबाबत इच्छुकांचीही गोची झाली आहे.
‘ओपन’मधील इच्छुकांच्या वाटेला पुन्हा प्रतिक्षा
2010 मध्ये सागर प्रल्हाद चव्हाण महापौर होते. यानंतर आता पर्यंत महापौरपद महिलांकडेच आहे. सध्याच्या स्थितीनुसार सभागृह अस्तित्वात आल्यानंतर अडीच वर्ष ओबीसी महिलांना महापौरपदावर संधी मिळणार आहे. त्यामुळे ओपनमधील इच्छुकांच्या वाटेला पुन्हा प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. राज्य शासनाने जुनी महापौरपदाची आरक्षण सोडत रद्द केली आणि नव्याने काढण्याचा निर्णय घेतला तरच यामध्ये बदल होणार आहे.
त्रिदसस्यीय प्रभाग रचनेनुसार महापौरपदाची संधी असणारे प्रभाग
प्रभाग परिसर
प्रभाग 1 ब आंबेडकर नगर, शुगरमील, उलपे मळा
प्रभाग 2 ब हनुमान तलाव, लक्ष्मीविलास पॅलेस, लाईन बजार,
प्रभाग 6 अ मार्केट यार्ड, महाडीक माळ, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क,
प्रभाग 8 अ महावीर कॉलेज, आर. टी. ओ. ऑफिस, रमणमळा, नागाळा पार्क,
प्रभाग 14 अ कमला कॉलेज, टाकाळा खण, राजारामपूरी पोलिस स्टेशन
प्रभाग 19 अ नेहरूनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, सीरत मोहल्ला.
प्रभाग 20 अ -मंगेशनगर, वारे वसाहत, संभाजीनगर, महालक्ष्मीनगर
प्रभाग 22 अ संध्यामठ गल्ली, फिरंगाई परिसर, जुना वाशी नाका, खंडोबा मंदिर
प्रभाग 23 अ रंकाळा टॉवर, निवृत्ती चौक, साकोली कॉर्नर,
प्रभाग 29 अ कात्यायनी कॉम्प्लेक्स, मध्यवर्ती कळंबा कारागृह, शेंडापार्क,
प्रभाग 31 अ पुईखडी, आपटेनगर परिसर, सुर्वेनगर, सुर्वेनगर, आयोध्या कॉलनी