‘तरुण भारत’च्या वृत्तानंतर लिकींग, वाराईचा मुद्दा निकाली : कृषी दुकानदारांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : ट्रान्सपोर्ट कंपन्यांनीच वाराई द्यावी-जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : दोन दिवसांत युरियाचा पुरेसा साठा होणार उपलब्ध
प्रतिनिधी/कोल्हापूर
युरिया खतासोबत लिंकींगची (अन्य कृषीपूरक साहित्य) सक्ती केल्यास त्या खत कंपनीची माझ्याकडे लेखी तक्रार द्या, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी कृषी दुकानदार संघटनेचे प्रतिनिधी आणि कृषी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिली. अन्य जिल्ह्यात वाहतूकदारांकडून वाराई दिली जात असताना केवळ कोल्हापूरातील वाहतूकदारांकडून का दिली जात नाही ? असा सवाल उपस्थित करून यापुढे ट्रान्सपोर्ट कंपन्यांनीच वाराई द्यावी अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी वाहतूकदार प्रतिनिधींना दिली. जिह्यात येत्या दोन दिवसांत युरिया खताची पुरेशी उपलब्धता होईल असेही रेखावार यांनी स्पष्ट केले.
कृषी विभागाकडून युरिया खताच्या उपलब्धतेबाबत कागदोपत्री खेळ सुरु असला तरी गेल्या दोन महिन्यांपासून युरियाचा दुष्काळ आहे. याबाबत ‘युरिया टंचाईचे दुष्टचक्र कायम’ या मथळ्याखाली ‘तरुण भारत’मध्ये वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी त्याची गंभीर दखल घेतली. असोसिएशन ऑफ कोल्हापूर बि-बियाणे, किटकनाशके व खते व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, सचिव सागर खाडे, शिवराज पाटील, कृषी विकास अधिकारी भीमाशंकर पाटील यांच्यासह ट्रान्सपोर्ट कंपनीच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक घेतली. या बैठकीपूर्वी कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेमध्ये वाराई स्वतः भरण्यास नकार देणाऱया ट्रान्सपोर्ट कंपनीच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी रेखावार यांनी खडे बोल सुनावले. अन्य जिह्यात रेख पॉईंटपासून कृषी दुकानापर्यंत खत पोहोच केल्यानंतर वाहतूकदारांकडून प्रतिटन 50 रूपये वाराई दिली जाते. मग कोल्हापूरात कृषी दुकानदारांकडून वाराई का घेतली जाते ? असा सवाल जिल्हाधिकाऱयांनी उपस्थित केला. यापुढे वाहतूकदारांनीच वाराई द्यावी, त्यांना हे शक्य नसेल तर खत वाहतूक करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे रेखावार यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱयांच्या या भूमिकेनंतर वाहतूकदार कंपन्यांनी नमती भूमिका घेत वाराई स्वतः भरण्याचे मान्य केले. वाराईचा मुद्दा निकाली निघाल्यामुळे कृषी दुकानदारांनी खत घेण्याचे मान्य केले. त्यामुळे जिह्यात येत्या दोन दिवसांत युरियासह अन्य खते मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आभार, ‘तरुण भारत’चे कौतूक
लिंकींग आणि वाराईच्या प्रश्नांवरून गेले दोन महिने जिल्ह्यात युरियासह अन्य खतांची टंचाई आहे. जिह्यात खतांचा दुष्काळ असतानाही कृषी विभागाकडून खत उपलब्ध असल्याचा दावा केला जात होता. पण याबाबतची वस्तूस्थिती ‘तरुण भारत’च्या माध्यमातून समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी कृषी सेवा केंद्रांचे प्रतिनिधी, कृषी अधिकारी आणि वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन वाराई आणि लिंकींगचा मुद्दा निकाली काढला. त्यामुळे कृषी सेवा केंद्रचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले. तर वाराई आणि लिंकींगचा प्रलंबित प्रश्नावर सडोतोड लिखाण करून न्याय मिळवून दिल्याबद्दल जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांकडून ‘तरुण भारत’चे कौतूक केले जात आहे.