संतोष पाटील / कोल्हापूर
हे हि नसे थोडकऺ …..तीन वर्षाच्या अंतरानंतर कोल्हापुरात धुमधडाक्यात गणेश उत्सव साजरा होत आहे. २०२० आणि २०२१ चा महापूर आणि दरम्यानच्या काळातील कोरोना संसर्ग यामुळे निर्बंध आणि लोकलज्जा या कारणास्तव सार्वजनिक उत्सव शांततेत पार पडला. आता तीन वर्षानंतर होणारा उत्सव बेभान आणि सर्व नियमांचा कडेलोट करणारा असेल अशी अटकळ होती. 2017 आणि 18 मध्ये तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पारंपारिक वाद्याच्या गजरात विसर्जन मिरवणूक सोहळा पार पाडला. तरीही दोन-चार मंडळांनी साऊंड सिस्टिमचा दणदणाट करून गालबोट लावलेच होते. मागील काही वर्षात कोल्हापूरची विसर्जन मिरवणूक म्हणजे कर्णकर्कश आवाजाचा दणदणाट आणि बेभान नाचणारी तरुणाई हे समीकरण बनले आहे. या पार्श्वभूमीवर तीन वर्षानंतर हा होणारा सोहळा कसा असेल, याबाबत सर्वसामान्यांमध्ये मोठी उत्कंठा होती. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मागील दीड दोन महिन्यांपासून उत्सवाबाबतचे केलेले नियोजन फळास आले, असेच आजची आत्तापर्यंतची मिरवणूक सोहळा पाहून म्हणावं लागेल. आज सकाळी सुरू झालेली मिरवणूक दुपारी चार वाजेपर्यंत तरी शांततेत आणि पारंपारिक वाद्याच्या गजरात होती. मागील दहा दिवस मंडळांनी पाळलेला संयम स्पष्ट दिसला. विशेष म्हणजे या मिरवणूक सोहळ्यात अबाल-वृद्धांसह महिलांची लक्षणीय संख्या आहे. मागील दहा दिवसात साऊंड सिस्टिमचा ठेका असला तरी त्यावर मर्यादा होत्या. वेळेचं बंधन होत. पोलीस प्रशासनाने केलेले आवाहन आणि प्रयत्नास बऱ्याच अंशी यश आले. महाद्वार रोड या चिंचोळ्या मार्गावरून एकाच वेळी संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत तीनशे ते साडेतीनशे मंडळांच मार्गक्रमण हे, अत्यंत धोकादायक असेच होते. यावर उपाय म्हणून यंदाच्या वर्षी पर्यायी आणखी दोन मिरवणूक मार्ग सुरू झाले. कोल्हापूरने जलप्रदूषण रोखण्यासाठी मूर्तिदान हा उपक्रम राज्याला दिला, 1982 ला रंकाळा तलाव संवर्धनाच्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ 1990 मध्ये बाळसं धरू लागली. 2001 मध्ये मूर्तिदान चळवळीने मुळं धरण्यास सुरुवात केली. काही वर्षातच 35 हजार मूर्ती भाविकांनी दान केल्या. 2010 नंतर कोल्हापूरचा गणेशउत्सव आणि मूर्तीदान ही परंपरा वटवृक्ष बनली. कोल्हापूरची ही मूर्तीदानाची परंपरा यंदाही कायम राहावी, यासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे या पहाटे पाच वाजेपर्यंत इराणी खण परिसरात थांबून होत्या. यंदा जिल्ह्यात सुमारे चार लाखाहून अधिक गणेश मूर्ती दान झाल्या. मूर्तिदान ही परंपरा बनण्यास, रुजण्यास तब्बल दोन दशकांचा कालावधी जावा लागला. कोल्हापूरच्या मिरवणुकीतील आवाजाचा अतिरेक, दणदणाट आणि त्यावर बेफान होऊन नाचणारी तरुणाई हे चित्र पालटण्यास काही वर्षे जावी लागतील. नव्या पर्यायी मिरवणूक मार्गांची सुरुवात, साऊंड सिस्टिमच्या आवाजाची आणि वेळेची मर्यादा, मिरवणूक मार्गावर सर्वांना समान संधी मिळावी, तसेच मिरवणूक रेंगाळणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाने केलेले वेळेचे नियोजन हे शैलेश बलकवडे यांचे प्रयत्न भविष्यातील कोल्हापूरच्या उत्सवाला दिशा देणारे, चांगल्या बदलाची नांदी ठरणार आहेत. यंदाच्या वर्षी प्रशासनाकडून थोडी जरी ढिलाई झाली असती तर मूर्तीदान ही परंपरा इतिहास जमा होण्यास वेळ लागला नसता. उत्सवातील बेफामवृत्ती अतिरेकीपणाचा टोक गाठणारी ठरण्याची भीती होती. याअर्थानेयंदाच्या वर्षी बलकवडे दांपत्याने केलेलं प्रामाणिक प्रयत्न एकूणच उत्सवासह विसर्जन सोहळ्याला शिस्त लावणारी आणि भविष्यातील कोल्हापूरचा गणेशउत्सव एका वेगळ्या उंचीवर नेणारे ठरणार आहेत. कोल्हापुरी जगात प्रसिद्ध आहे, जे जे नवे आणि समाजहिताचे ते ते कोल्हापूरकर स्वीकारतात, हा इतिहास आहे. ठोका चुकवणारा दणदणाट आणि क्षणोक्षणी मांढरदेवी यात्रेतील दुर्घटनेची आठवण करून देणारी महाद्वार रोड या चिंचोळ्या मार्गावरून निघणारी मिरवणूक हे चित्र येत्या काही वर्षात नक्कीच पालटलेले दिसेल, असेच आशादायी चित्र आजच्या मिरवणूक सोहळ्यातून दिसत आहे. आज रात्री काही हातावर मोजणाऱ्या मंडळांकडून आवाजाचा अतिरेक नक्की होईल, जसे जेवताना घासात कधी एखादा खडा लागतोच, म्हणून संपूर्ण अन्नाला कोणी नावे ठेवत नसते. तसेच सोहळ्यातील अतिरिकपणा करणाऱ्यां मोजक्यांकडे दुर्लक्ष करून यंदाच्या सोहळ्यानिमित्त पडत असलेला चांगला पायंडा आणि पोलीस, महापालिका प्रशासन यांनी प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न हे विसरून चालणार नाहीत. संतोष पाटील