शाहूजयंतीदिनी मुस्लिम तरुण, ज्येष्ठांचा अनोखा उपक्रम : टेंबलाई मंदिर परिसरासह शहरात 150 वटवृक्षांचे करणार रोपण, प्रत्येक वृक्षाला देणार मावळे, रणरागिणींचे नाव
संग्राम काटकर/कोल्हापूर
गडद सावली देणारा वृक्ष कोणता असे जर म्हंटले तर वटवृक्ष (वड) नजरेसमोर येतो. तासाला 1200 किलोपर्यंत ऑक्सिजन देणाऱया आणि फांद्यापासून सालींचा औषधासह अन्य कामांसाठी उपयोग होणाऱया वटवृक्षाला वनस्पतीशास्त्रात महत्व आहे. आता हा बहुउपयोगी वटवृक्ष छत्रपती शिवरायांनी स्थापपेल्या स्वराजासाठी योगदान दिलेल्या मावळे, रणरागिणींची आठवण घेऊन लावला जातोय. त्यासाठी टेंबलाईवाडीतील प्रगती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मुस्लिम तरुण, ज्येष्ठांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्याकडून टेंबलाईनाका ते टेंबलाई मंदिर या पालखीमार्गासह 15 ठिकाणी 150 वटवृक्षाचे रोपण केले जाणार आहे. येत्या 26 जून रोजीच्या शाहूजयंतीदिनीचे औचित्य साधून लावल्या जाणाऱ्या या वटवृक्षांना मावळे, रणरागिणींची नावे देत जतन सवंर्धनाचा विडाही उचलला जाणार आहे.
जयंती सोहळा असो अथवा नेत्याचा वाढदिवस असो. तो साजरा करताना डिजीटल लावण्यावर भर असतो. पण प्रगती सहकारी गृहनिर्माण संस्थेतील मुस्लिम तरुण व ज्येष्ठांनी शाहूजयंतीला डिजीटल फलक लावण्याऐवजी वटवृक्ष लावण्याचे प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. हे वटवृक्ष लावताना धार्मिक, विज्ञान आणि इतिहास याची ही सांगड घातली जाणार आहे. वटवृक्षापासून मिळणारे फायदे व पर्यावरणाशी असलेला संबंधही त्यांनी वनस्पतीतज्ञाकडून जाणून घेतला आहे. हा फायदा लोकांना देण्यासाठी टेंबलाईनाका ते टेंबलाई मंदिर या ललितापंचमी पालखी मार्गावर दुतर्फा 40 वटवृक्षाचे त्यांच्याकडून रोपण केले जाणार आहे. याचबरोबर शहरातील विविध 15 ठिकाणी ही 110 वटवृक्ष लावणार आहेत. प्रत्येक झाडाचे नामकरण करताना जाणिवपूर्वक छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांसह राजामाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराराणी, हिकरणी यांच्यासह विविध रणरागिणींची नावे दिली जाणार आहे. जेणे करुन या झाडांच्या रुपाने समाजाला मावळा, रणरागिणींनी घडवलेल्या इतिहासाची आठवण रहावी.
ऐनपावळ्यात लावल्या जाणाऱया या 150 वटवृक्षांना सेंद्रीय खत आणि पाणी घालण्याचे काम मुस्लिम तरुण व ज्येष्ठांकडून केले जाणार आहे. ज्या भागात वटवृक्षाचे रोपण केले जाणार आहे, तेथील तरुण व जाणकारांची मोट बांधून त्यांच्यावरही झाडांची जबाबदारी सोपवली जाणार आहे. असे केल्याने दिर्घकाळ झाडांचे संवर्धन होईल.
जयंतीदिनी मंडळांनी झाडे लावावीत
शिवजयंती आणि शाहूजयंती साजरी करत असताना मंडळांनी एक मिशन म्हणून झाडे लावण्याचा उपक्रम हाती घ्यावा. दोन्ही जयंतीदिनी प्रत्येक मंडळाने फक्त पाच झाडे लावल्यास अनोखी हरितक्रांती घडून येईल. शिवाय ही झाडे लावताना पाऊस, ऑक्सिजन आणि सावली याला डोळ्यासमोर वटवृक्षासह कडुलिंब, सातवीन, करंज, बहावा, सोनचाफा, पारिजातक, फळस, करंबळ, बेल, कवट, गोंदणी, भोकर, कुंती, आंबा, पायर, उंडल अशी झाडे लावावीत.
असे आहे वटवृक्षाचे महत्त्व…
हवेतील विषायू वायू शोषून घेतो.
हवेत मोठय़ा प्रमाणात ऑक्सिजन सोडतो.
उन्हाळ्याच्या दिवसात पाणी व बाष्प वातावरणात सोडण्याचे काम करतो.
गाव-शहरात पाऊस चांगला होण्यास मदत.
पान, चिक, फुले आणि मुळांचा औषध तयार करण्यासाठी उपयोग.
चिक संधीवात आणि दातदुखीवर गुणकारी.