Kolhapur News : “वाजवायला बँड वाला आणि गाजवायला मिशीवाला”अशी एक म्हण आहे.आणि ती बँड वाल्यांच्या आयुष्यात खरी ठरली आहे.कोल्हापुरातले बँड वाले रोज त्याचा अनुभव घेत आहेत.सोहळ्याची शोभा वाढवायला बँड वाला तर पाहिजेच. पण प्रचंड उपेक्षा सहन करत त्यांना आपले सूर आळवावे लागत आहेत. किंबहुना त्याच्या सुराच्या कलब लाटात त्याच्या उपेक्षाची वेदनाच हरवून गेली आहे.आज एका मोर्चाच्या निमित्ताने हे बँड वाले एकत्र आले.आणि मोर्चा संपल्यानंतर आपल्या मनातील वेदनांना मोकळी वाट करून निघून गेले.
कोल्हापुरात पापाची तिकटी ते कुंभार गल्ली हा उतरणीचा रस्ता अवघ्या आठ दहा फुटाचा आहे.याच रस्त्यावर या बँड वाल्यांचे दुतर्फा छोटे-छोटे गाळे आहेत.भिंतीवर वेगवेगळी वाद्ये अडकून ठेवली आहेत.या छोट्या गाळ्यात एक दोघे दिवसभर बसलेले असतात.लग्न, मुंज, बारसे, मुहूर्तमेढ, ओटी भरणी, पालखी अशा सोहळ्यासाठी सुपारी घेत असतात.काळाच्या ओघात सोहळ्यांचे स्वरूप बदलले आहे.बँड पेक्षाही बँजो ढोल ताशाला डिमांड आहे. मंगल सोहळ्यात सुरेल सुरांच्या पेक्षा कडकडाटला स्थान मिळाले आहे. आणि या सगळ्या वातावरणात बँडवाल्यांच्या आयुष्याचाही सूर बिघडला आहे.
कोल्हापुरात राजकमल, प्रभात, साळोखे गंधर्व, जनरल, महाराष्ट्र, प्रभात, सुप्रभात या जुन्या बँड कंपन्या.या बँड कंपन्यांच्या ताफ्यात किमान 15 ते 20 वादक असायचे.बहुतेक लग्नात रात्री वरात असायची.रात्री उशिरा वरातीत या बँडचे सुर अर्धवट झोपेत कानावर पडायचे.आणि हे सूर सर्वांनाच आपल्या गॅलरी खिडक्या दरवाज्यात येऊन उभारायला लावायचे.वरातीच्या बँड मध्ये धागडधिंगाची गाणी अजिबात नसायची.वरात शिवाजी पुतळ्याजवळ आली की “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती” हे गाणे बँड वर ठरलेलेच असायचे.महाव्दार रोड वरून बँड पथक जाताना मराठी भावगीते, मुस्लिम वस्तीतून वरात जाताना कव्वाली हे तर लिखितच ठरले होते.मशिदीसमोरून वरात जाताना दोन मिनिटे का होईना बँड वाजवायचे थांबवले जायचे.आणि वरातीतील तरुणांना नाचायला एक शेवटची संधी म्हणून वरात संपताना दणदणाटातले एक गाणे सादर केले जायचे.
बँड वाल्यांच्या या सुरां च्या साथीने कोल्हापुरातील लग्न, बार से,मुंज, जावळ, ओटी, भरणी , पालखी हे असंख्य सोहळे साजरे झाले.किंवा कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेत बँड वाल्यांचे स्थान अपरिहार्य ठरले. त्यामुळे कोल्हापुरात बँड व्यवसाय चांगलाच रुजला.काळाच्या ओघात मात्र बँड पेक्षा बेंजो डॉल्बी ढोल ताशाला मागणी वाढली.आणि बँड वाल्यांच्या वाट्याला उपेक्षा यायला सुरुवात झाली.आज पापाच्या तिकटीला बँड वाले आहेत पण व्यवसाय टिकवण्यासाठी त्यांची अक्षरशः कसरत चालू आहे.सोहळ्याला बोलावले तर सोहळ्यातले स्थान नावापुरते आहे.बँड पथकाच्या गाडीत दहा-बारा जण कोंबून बसलेल्या अवस्थेत त्यांचा प्रवास आहे. पथकात सर्वांनाच आता वाजवायला येत नाही.कारण नवी पिढी त्यात तयार होत नाही.त्यामुळे नवख्यांना घेऊन कसा बसा व्यवसाय टिकवला जात आहे.वाट्याला अवमान आहे.उपेक्षा आहे.पण जगायचा एकच सूर माहित असल्याने बँड व्यवसाय कसाबसा जिवंत तरी आहे.
निकाल लागला की बँन्ड….
आता दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण चे प्रमाण 90% च्या वर आहे पण मॅट्रिक (अकरावी)परीक्षा होती.तेव्हा निकाल 40% लागायचा.किमान चार-पाच वेळा मार्च,ऑक्टोबर फेऱ्या मारत मुले उत्तीर्ण व्हायची.आणि सात आठ वेळा फेर परीक्षेला बसून पास झालेला कॉलेजला पहिल्या दिवशी निघाला की,त्याच्या दारात सकाळी बँड वाजवून त्याची मित्रांच्याकडून टर उडवण्याची कोल्हापुरात पद्धत होती.
शुर आम्ही सरदार….
कोल्हापुरात बँड वाल्यांनी केवळ हिंदी चित्रपट गीतेच वाजवली नाहीत.शौर्य गीते,भावगीते,नाट्यगीते,देशभक्तीपर गीते,लावणी वाजवली.आज निषेध मोर्चात तर “शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती” हेच गाणे वारंवार वाजवून बँन्डवाल्यांनी आपल्या भावना सुरातून व्यक्त केल्या.
Next Article खळबळजनक !मालवणात सापडला अर्धवट जळालेला मृतदेह
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.