उचगाव/वार्ताहर
करवीर तालुक्यातील गांधीनगर परिसरामध्ये गोवा बनावटीची विदेशी दारू तसेच गावठी दारू ची विक्री राजरोसपणे चालू आहे. परिसरामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये मोठ्या चोऱ्यांमध्येही वाढ झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बेटिंग ने ही जोर धरल्यामुळे पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
शनिवारी गडमुडशिंगी तालुका करवीर येथील बनावट दारू निर्मितीचा कारखाना इचलकरंजी येथील राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी उध्वस्त केला. येथे गोवा बनावटीच्या विदेशी दारूची महाराष्ट्र राज्य बनावटीच्या दारूची अवैधरित्या निर्मिती केली जात होती. या बनावट विदेशी दारूच्या कारखान्यावर छापा टाकून चार चाकी सह नऊ लाख ६३ हजार ४२५ रुपये किमतीचा बनावट दारूचा साठा जप्त केला.सागर चावला या.गांधीनगर, सचिन कुरणे रा.चिंचवाड यांच्या सह पाचजणांना वर कारवाई केली.
गांधीनगर परिसरामध्ये महामार्ग वरून पहाटे वा रात्री उशिरा गोवा बनावटी दारूची तस्करी होते अशी जोरदार चर्चा परिसरात असून गावठी दारूची ही विक्री वाढल्याचे चित्र आहे. गडमुडशिंगी, उचगाव, वसगडे, गांधीनगर चिंचवाड, वळिवडे, सरनोबतवाडी गावच्या हद्दीमध्ये गावठी दारू, गोवा बनावटीच्या विदेशी दारू यांची सर्रास विक्री होत आहे.याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झालेले आहे.त्यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. यावर कारवाई करून पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
परिसरात ओपन बारची समस्या
उचगाव कमानी जवळ कोल्हापूर हूपरी रस्त्यावर ओपन बार चालतो. येथे टपऱ्यावर, खोक्यात, उघड्यावर मद्यपी दारू पीत असल्यामुळे विशेषतः महिलांना शाळकरी मुलांना याचा त्रास होतो. उचगाव व गांधीनगर परिसरामध्ये मोकळ्या ठिकाणी ओपनबार चालू असून पोलिसांची याकडेही दुर्लक्ष झालेले आहे.
गांधीनगर परिसरात चोऱ्यांमध्ये ही वाढ झालेली असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. माल खरेदीसाठी आलेल्या पोपट तवटे यांची अडीच लाख असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. गांधीनगर मुख्य रस्त्यावरील मोहित ट्रेडर्स या दुकानाचे शटर्स उचकटून 42 हजार रुपयांचा माल लंपास केला तर बॅटरी तसेच ८२००० चे मोबाईल चोरी आदी चोऱ्या एक महिन्याभरात झालेल्या आहेत. उचगाव कमानी जवळून एका घरातून ४२ तोळे सोने चोरीस गेल्याची तक्रार ही गांधीनगर पोलिसात आलेली आहे.दुकानांचे शटर्स उचकटून चोऱ्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बेटिंगची पाळे मुळे गांधीनगर परिसरात घट्ट रुजली असून क्रिकेटवर येथे सट्टा लावला जातो. यामध्ये कोट्यावधीची उलाढाल होत असून त्यामुळे अनेक जण कर्जबाजारी झालेले आहेत. युवकांना बॅटिंगचा नाद लागल्यामुळे पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. या सर्वावर गांधीनगर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.