सोलापूर : सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना भरधाव कारने चिरडलं असून यामध्ये ७ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसंच ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नक्की वाचा- मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघाले होते. मात्र वाटेत सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ चालत असताना आज सायंकाळच्या सुमारास एक भरधाव कार थेट दिंडीत घुसली. यावेळी झालेल्या अपघातात तब्बल १५ वारकरी गंभीर जखमी झाले होते. यातील ७ जणांचा मृत्यू झाला असून ८ जणांचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. वारकऱ्यांना धडक देणाऱ्या टाटा नेक्सॉन कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कारमधील व्यक्ती या सांगोला तालुक्यातील सोनंद या गावातील रहिवासी आहेत.