एकाच ठिकाणी अनेक वर्षे ठाण मांडलेल्या ग्रामसेवकांची बदली
कोल्हापूर प्रतिनिधी
जिह्यातील ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या यापूर्वी 2012 मध्ये प्रशासकीय बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आज अखेर जिल्हास्तरीय प्रशासकीय बदल्या केल्या नाहीत. ग्रामसेवक संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांचा 31 मे 2022 पर्यतचा सलग वास्तव्य सेवा कालावधी धरला तर एकाच तालुक्यात सलग 10 वर्षे पेक्षा जास्त सेवा झालेले 284 ग्रामसेवक आहेत. त्यामुळे अनेक ग्रामसेवकांची वतनदारी निर्माण झाली होती. पण जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी ही वतनदारी मोडीत काढून जिह्यातील 74 ग्रामसेवक आणि 15 ग्रामविस्तार अधिकाऱ्यांची समुपदेशनाने बदली केली.
अनेक ग्रामसेवकांनी एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम केल्यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण झाली होती. चंदगड तालुक्यात तब्बल 35 पदे रिक्त राहिली होती. शाहूवाडी तालुक्यातही रिक्त पदांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे प्रशासक चव्हाण यांनी समानीकरणाचे धोरण अवलंबून रिक्त पदे भरण्यासाठी प्राधान्य देत प्रत्येक तालुक्यात ग्रामसेवकांची 8 टक्के पदे रिक्त ठेवली. या प्रशासकीय बदलीनंतर अनेक ग्रामसेवकांनी प्रशासक चव्हाण यांच्याकडे सोयीच्या बदलीसाठी विनंती केली. पण त्यांनी त्यांची मागणी फेटाळली.
ग्रामविकास अधिकारी संवर्गातील कार्यरत कर्मचाऱयांचा 31 मे 2022 पर्यंतचा सलग वास्तव्य सेवा कालावधी धरला तर एकाच तालुक्यात सलग 10 वर्षे पेक्षा जास्त सेवा झालेले 69 ग्रामविकास अधिकारी आहेत. त्याचे प्रमाण जिल्हा स्तरीय मंजूर पदांच्या 36 टक्के व कार्यरत पदांच्या 39 टक्के इतके आहे. एकाच ठिकाणी अनेक वर्ष काम केल्यामुळे त्या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱयांचे स्थानिक हितसंबंध निर्माण होवून नागरीकांना उपयुक्त अशा सेवा परिणामकारक रित्या मिळत नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. तसेच ग्रामीण भागात विकासात्मक कामावरही याचा विपरित परिणाम होत होता. जनतेला आवश्यक व उपयुक्त सेवा पारदर्शकपणे व विहित कालावधीत देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेवाहमी सारख्या महत्वपूर्ण कायद्याच्या अंम्मलबजावणीवर देखील विपरित परिणाम झाला होता. याच पार्श्वभूमीवर राज्यातील नागरीकांना शासकीय सेवा विहित वेळेत मिळत नसल्याबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्यामुळे लोकप्रतिनिधींकडूनही ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱयांच्या प्रशासकीय बदल्याबाबत वारंवार मागणी होत होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या पुढे कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेवेळी मुख्यालयासह 12 तालुक्यातील कार्यरत पदे व रिक्त पदे समान राहतील व त्यांचा समतोल राखूनच बदली प्रक्रिया हाताळण्याबाबत ठराव झाला होता. त्यानुसारच बदलीची कार्यवाही करण्यात आली.
दुर्गम तालुक्यात सर्वाधिक रिक्त पदे
जिल्हयाच्या सरासरी पेक्षा चंदगड, शाहूवाडी, गडहिंग्लज, गगनबावडा या तालुक्यात सातत्याने रिक्त पदांची संख्या जास्त असल्याने विकास कामांवर विपरित परिणाम जाणवत होता. दुर्गम व डोंगराळ भागात अनेक वर्षे काम केल्यामुळे तेथील कर्मचाऱयांमध्ये एक प्रकारची उदासिनता व नैराश्य आल्याचे प्रशासनाला आढळले. तसेच कोल्हापूर शहराजवळील करवीर, हातकणंगले, कागल, पन्हाळा या तालुक्यामध्ये तेच ते ग्रामसेवक अनेक वर्षे कार्यरत होते. 12 तालुक्याकडील ग्रामसेवकांची पदांमध्ये असमतोल दिसून आला. केवळ चंदगड तालुक्यामध्ये ग्रामसेवकांची 34 पदे रिक्त होती. तर गडहिंग्लज, शाहूवाडी व गगनबावडा या तालुक्यामध्येही रिक्त पदांचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे प्रशासक चव्हाण यांनी मंगळवारी ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱयांची बदली केली.