कुरुंदवाड/प्रतिनिधी
विविध ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून दाम दुपटीच्या अमिषा पोटी अनेकांची फसवणूक झाली हे प्रकरण ताजे असतानाच आता नोकर भरतीचे आमिष दाखवून एका भामट्याने चक्क कुरुंदवाडसह कोल्हापूर जिल्ह्यातील युवक व पालकांना दीड ते पावणेदोन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार कुरुंदवाड शहरात पुढे आला आहे. आयकर खात्यात व आर्मीत भरती करतो असे सांगून कलकत्ता येथील एका भामट्याने कुरुंदवाडसह कोल्हापूर जिल्ह्यातील १९ युवकांना गंडा घातल्याची तक्रार आनंदा गणपती करडे (रा. कुरुंदवाड, ता.शिरोळ) याने कुरुंदवाड पोलीस व जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे दिली आहे. सुबोधकुमार(रा.कलकत्ता) असे फसवणूक करणाऱ्या भामट्याचे नाव आहे. (cheated by showing inducement of job)
दरम्यान फसवणूक झालेल्या युवकांनी भामट्याने दिलेल्या बँक खाते क्रमांकावर पैसे पाठवले आहेत. यासर्व बँकेच्या नोंदी तक्रारी सोबत सादर केल्या आहेत. आयकर विभागातून माहिती घेण्यात आली आहे. ही फसवणूक झाली असून आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे मार्गदर्शन मागितले आहे. तर दोन दिवसात गुन्हा दाखल करणार असल्याचे सपोनि बालाजी भांगे यांनी सांगितले.
आनंदा करडे यांच्या एका मुलाला आयकर विभाग दिल्ली येथे तर दुसऱ्या मुलाला आर्मीत भरती करतो असे सुबोध कुमारने सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी असे पंधरा लाख रुपये घेतले आहेत. करडे व त्यांच्या सहकाऱ्यांना सैन्यात ३५ मुलांची बॅच पाठवायची आहे. आणखीन मुले असतील तर घेऊन या असे आमिष दाखवल्याने जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, कोल्हापूर, इचलकरंजी, शिरोळ कुरुंदवाड येथील १८ युवकांच्या पालकांनी सुबोधकुमार याच्या वेळोवेळी मागणी नुसार लाखो रुपये खात्यावर जमा केले आहेत.
या युवकांना सुबोधकुमारने ट्रेनींगसाठी कलकत्ता येथील कमांडर हॉस्पिटल येथे उपस्थित करून विविध कागदपत्रकांच्यावर सह्या घेतल्या व पोस्टाने तुम्हाला पत्र येईल असे सांगून परत पाठवून दिले होते. यांनतर पालकांचा सुबोध कुमार याच्याशी फोनवरून संपर्क सुरू होता. मात्र २५ जुलै २०२२ पासून सुबोध कुमारचा फोन बंद लागत आहे. त्याच्याशी आज तगायत पालकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही. हा भामटा असल्याची व आपली फसवणूक झाल्याची खात्री पालकांची झाली आहे.
पालकांनी शेत,घर आणि वाहनावर कर्ज काढून दाग-दागिने विकून मुलांच्या कल्याणासाठी सुबोध कुमार या भामट्याला पैसे दिले आणि मुलाच्या नोकरीचा मोह पचणी न पडत फसवणूक पदरात पडल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत. नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळी राज्यात-जिल्ह्यात कार्यरत आहेत. यांच्या मुसक्या आवळणे हे पोलीस प्रशासना समोर आवाहन आहे.