हजारो भाविकांची उपस्थिती; भक्तीपूर्ण वातावरणात कार्यक्रम
कोल्हापूर प्रतिनिधी
स्वामी भक्त -स्वामी सेवकांच्या वतीने पंचगंगा नदीच्या काठावर आयोजित केलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरण सोहळय़ाला हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली. स्वामींच्या नामस्मरणात झालेल्या या सोहळय़ात उपस्थित भाविक भक्तीमध्ये तल्लिन झाले. रविवारी सायंकाळी हा भक्तीपूर्ण वातावरणात सोहळा झाला.
स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरण सोहळय़ाचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. पंचगंगा नदीच्या काठावर रविवारी सायंकाळी 6 वाजता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते पंचगंगा नदीची आरती करून या सोहळय़ाचा प्रारंभ करण्यात आला. नदीच्या घाटावर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती. तसेच समोरील बाजूस प्रकाशझोतात भक्तांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी साडे सहा वाजता नामस्मरणाला प्रारंभ करण्यात आला. नामस्मरण पूर्ण झाल्यानंतर गजर आणि आरती करण्यात आली. त्यानंतर प्रसादाचेही वाटप करण्यात आले. सुमारे तीनहजारहून अधिक पुरूष, महिला भाविकांनी या सोहळय़ाला हजेरी लावली. यावेळी आयोजक समितीचे अरूण गवळी, गुरूदेव स्वामी, धनंजय महिंद्रकर, अमित पाटील, अभिजित पाटील, बाळासाहेब राऊत यांच्यासह भक्तगण उपस्थित होते.