कोल्हापूर प्रतिनिधी
महापालिका प्रशासन नालेसफाईचा दावा करतय मग काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शहर का तुंबले? शहरातील नाल्यांचे नैसर्गिक स्त्रोत वळविल्याने तसेच नाल्यातच बांधकामे झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे नाले गेले कुठे ? अशी विचारणा सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱयांनी महापालिका प्रशासनाला केली. दरम्यान महापालिकेचे दोन अधिकारी व कृती समितीचे पाच पदाधिकारी यांनी संयुक्तपणे आज, गुरुवारी नाल्यांची पाहणी करुन मोजमाप करण्याचे बैठकीत ठरले.
संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची काय तयारी आहे? याचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षिय कृती समिती व महापालिका प्रशासनासोबत बैठकीचे महापालिकेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत आडसुळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, ऍड. बाबा इंदूलकर, बाबा पार्टे आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी सर्व पक्षिय कृती समितीच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनाला पूरसंबंधित उपायोजनेबाबत महापालिकेची काय तयारी आहे यासंदर्भातील 8 प्रश्न दिले होते. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली.
बैठकीत बाबा इंदूलकर यांनी महापालिकेचा उद्यान विभाग व वृक्षसंवर्धन समिती काय करते? नुसती रस्त्यावर झाडे लावली म्हणजे झाले काय? त्याची निगा कोण राखणार? अशी विचारणा करुन उद्यान अधिक्षक व्याघ्रांबरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
दिलीप देसाई म्हणाले, नैसर्गिक नाल्यांचे स्त्रोत वळविले असून नाल्यांमध्येच बांधकामे करण्यात आली आहेत. नाल्याशेजारी 9 मीटरपर्यंत बांधकामाला परवानगी नसताना त्याची पायमल्ली करण्यात आली आहे. बसंत-बहार टॉकीजच्या मागे नाल्याशेजारीच महापालिकेने ले-आऊट मंजूर केला आहे. यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. महेश उत्तुरे म्हणाले, उद्यान विभागाच्या अधिकाऱयांना गेल्या एक वर्षापासून झाडाच्या फांद्या छाटण्यासंदर्भात फोन करतोय परंतु त्यांच्याकडून चालढकल होत आहे. किशोर घाटगे म्हणाले, पावसाळ्यात महावितरणच्या दुधाळी सबस्टेशनमध्ये पाणी येते. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होतो. त्यासाठी महावितरणने सबस्टेशनसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे का ? पूजा नाईकनवरे म्हणाल्या, पावसाळ्यात महावितरणची सबस्टेशन पाण्यात जाण्याचा प्रश्न सर्व शहरातच आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात जाऊन महावितरणच्या पथकाने माहिती घ्यावी. आवश्यकता वाटल्यास याबाबत अलर्ट द्यावा. सुनीता पाटील यांनी देवकर पाणंद येथील शाम सोसायटी परिसरातील ओढा व गटरांची साफसफाई झाली नसल्याचे सांगितले. शशिकांत बिडकर यांनी जयंती नाल्यावरील संभाजी पूल ते सुतारवाडा परिसरातील पूलापर्यंत नालेसफाई झाली नसल्याचे सांगितले. बाजीराव नाईक यांनी नदी, नाले परिसरात भराव टाकून बांधकामे केल्याने पुराचे पाणी लक्षतीर्थ वसाहत व सिध्दार्थनगर परिसरातील घरे पाण्यात जात असल्याचे निदर्शनास आणून दिले.
यावेळी माजी नगरसेविका माधुरी लाड, अनिल कदम, अशोक भंडारे, दुर्गेश लिंग्रस, फिरोज सरगुर, गीता हसूरकर, महादेव पाटील, अमर समर्थ, विवेक कोरडे आदी उपस्थित होते.