1025 ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक बंदीची कारवाई सुरु; जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून पाठपुरावा; आठ दिवसांमध्ये 20 हजार 500 रूपयांचा दंड वसूल
कृष्णात चौगले कोल्हापूर
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 1 जुलैपासून एकल वापर प्लास्टिकचे (सिंगल युज) उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. या शासन निर्णयाची जिल्हा परिषदेकडून काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. गेल्या आठ दिवसांत 14 ग्रामपंचायत क्षेत्रातील मॉल्स, दुकान, हॉटेल्सवर कारवाई करून त्यांच्याकडून 20 हजार 500 रूपयांचा दंड वसूल केला आहे. जिह्यातील 1 हजार 25 ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक बंदीचा सर्व्हे केला असून त्याबाबत विशेष ग्रामसभेमध्ये ठराव केले आहेत.
अधिक वाचा- नृसिंहवाडीत पहाटे तीन वाजता दक्षिणद्वार सोहळा संपन्न
सुधारीत प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 नियम 4 (2) नुसार पॉलिस्टीरीन (थर्माकोल) आणि विस्तारीत पॉलिस्टीरीनसह सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन, विक्री आणि वापर 1 जुलैपासून बंद केला आहे. शासन निर्णयानुसार प्लास्टिकच्या कांडय़ांसह कानकोरणी, फुग्यांसाठी वापरल्या जाणाऱया प्लास्टिकच्या कांडय़ा, प्लास्टिकचे झेंडे, आईस्क्रीम कांडय़ा, सजावटीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक, थर्माकोल, प्लेटस्, कप, ग्लासेस, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईचे बॉक्स, ढवळण्या, आमंत्रण कार्ड, सिगारेटच्या पाकिटाभोवती गुंडाळलेली प्लास्टिक फिल्म, प्लास्टिकच्या पीव्हीसी बॅनर, (100 मायक्रॉनपेक्षा कमी), सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या), कंपोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरीच्या पिशव्या वगळून) सर्व प्रकारच्या नॉन-ओव्हन बॅग्स, एकल वापराचे डिश, बाऊल्स, डबे (हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे) यावर बंदी आहे.
जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या आदेशानुसार जिह्यातील 1025 ग्रामपंचायतींनी आपल्या क्षेत्रातील प्लास्टिक उत्पादक, साठवणूकदार, वितरणकर्ता, दुकानदार, ई कॉमर्स कंपन्या, फिरत्या व्यावसायिकांना एकल वापराची प्लास्टिक विक्री बंदीची नोटीस दिली आहे. सर्वसामान्यांनाही प्लास्टिक बंदीबाबत सूचना दिल्या आहेत. तरीही प्लास्टिकचा वापर आढळल्यास नियमाचे उल्लंघन करणाऱयांचा माल जप्त करून दंडाची आकारणी केली जात आहे. संबंधित उद्योग, व्यावसायिकांचे कामकाज बंद केले जाणार आहे. प्लास्टिक वापराच्या पहिल्या गुह्यासाठी 5 हजार रूपये, दुसऱया गुह्यासाठी 10 हजार तर तिसरा गुन्हा केल्यास संबंधितास 25 हजार रूपये दंड व 3 महिन्यांचा कारावास होणार आहे.
प्लास्टिक बंदीचा ठराव आणि समितीची स्थापना
‘प्लास्टिक बंदी’च्या अंमलबजावणीसाठी 1025 ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभेमध्ये प्लास्टिक बंदीचा ठराव केला आहे. ग्रामस्तरीय प्लास्टिक बंदी समिती स्थापन केली असून प्लास्टिक बंदीचे फलक लावले आहेत.
14 ग्रामपंचायत क्षेत्रातील मॉल्स, दुकानदारांना दंड
प्लास्टिक विक्री, वापराबाबत आठ दिवसांत हातकणंगले तालुक्यातील 6 दुकानदारांवर पहिला गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 7 हजार 500 रूपये दंड वसूल केला आहे. करवीर तालुक्यातील एकाकडून 5 हजार,पन्हाळा तालुक्यातील 5 जणांकडून 5 हजार, राधानगरीतील दोघांना 3 हजार रूपये दंड केला आहे. 14 जणांवर प्लास्टिक विक्रीचे गुन्हे दाखल केले असून त्यांच्याकडून 20 हजार 500 रूपये दंड वसूल केला आहे. प्लास्टिक बंदीमध्ये
लोकसहभागाची गरज
प्लास्टिक वस्तू आरोग्यासाठी किती घातक आहे, त्या का वापरू नयेत, याबाबत सर्वांनी माहिती घेण्याची गरज आहे. प्लास्टिक बंदीची मोहीम यशस्वी करण्यासाठी कायद्याच्या धाकापेक्षा लोकसहभागाची गरज आहे. त्यासाठी जनतेने स्वतःहून यात सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी केले आहे.