विभागीय क्रीडा संकुलातील विदारक चित्र ः रबरबरीत चिखलात शालेय संघांचे सामने, खेळाडूंमधील कौशल्य दिसणे झाले बंद
संग्राम काटकर,कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर: विभागीय क्रीडा संकुल हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत आले आहे. अशातच सध्या सुरु असलेला मुसळधार पाऊस व त्यातून होणाऱ्या चिखलात सुब्रतो मुखर्जी मनपास्तरीय शालेय 14 वर्षाखालील मुलांची फुटबॉल स्पर्धा महापालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय टिकेचे धनी बनले आहे.संपूर्ण स्टड बुट बुडून जाईल इतक्या चिखलात होणारे सामने पाहून ही शालेय फुटबॉल स्पर्धा आहे की बैलांची चिखलगुठ्ठा स्पर्धा आहे, अशा भाषेत कोल्हापूरी फुटबॉलपटू संताप व्यक्त करत आहेत. चिखलात स्पर्धा खेळवण्याने शालेय खेळाडूंमधील कौशल्य व मैदानात टिकून राहण्याची क्षमता दिसणार तर नाहीच, शिवाय एक चांगला खेळाडू मैदानातील चिखलामुळे नजरेआड जाण्याची अशी भीती वरिष्ठ संघामधून व्यक्त होत आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून कोल्हापुरातील नवीन राजवाड्याजवळील पोलो मैदानात आयोजित केली जात होती.पोलो मैदानातील हिरवळीवर सामन्यावेळी जरी पाऊस पडला तरी त्याचा फारसा परिणाम खेळाडूंच्या खेळावर होत नव्हता. चिखल तयार होण्याचा तर प्रश्नही उद्भवत नव्हता. वरिष्ठ फुटबॉल संघाचे पदाधिकारी स्पर्धा स्थळी जाऊन सामन्यात चांगला खेळ करणाऱ्या आपल्या संघाच्या सराव शिबिरात येण्याचे सांगत होते.या शिबिरांमधूनच शिवाजी तरुण मंडळ,पाटाकडील तालीम,खंडोबा तालीम,प्रॅक्टीस फुटबॉल क्लबसह सर्वच संघांना चांगले शालेय खेळाडू मिळाले आहेत, हे नजरेआड करता येणार नाही. मात्र गेल्या सहा-सात वर्षांपासून विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानात पावसामुळे होणाऱ्या चिखलात जशा शालेय फुटबॉल स्पर्धा होऊ लागल्या तसे खेळाडूंमधील कौशल्यच दिसणे बंद झाले आहे.
चिखलामुळे ना पासिंग होते ना शुटींग
चिखलात खेळाडूंना खेळता येत नाही, हे माहिती असून दरवर्षी शालेय फुटबॉल स्पर्धा क्रीडा संकुलातच आयोजित केल्या जात आहेत. या स्पर्धांमध्ये शहर व जिह्यातील 100 ते 125 संघ सहभागी होतात. चिखलात होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंना ना पासिंग करता येते ना शुटींग करता येते. गोलखांबाजवळ साठणाऱ्या पावसाचे पाणी आणि त्यातील चिखलामुळे गोलरक्षकाला चांगल्या पद्धतीने गोलरक्षण करता येत नाही. अशी सगळी चित्रविचित्र परिस्थिती डोळ्यासमोर असतानाच विभागीय क्रीडा संकुलातील मैदानात सुब्रतो मुखर्जी शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. सध्याच्या मुसळधार पावसामुळे मैदानाची दैना उडाली असून त्यात कमालीचा चिखल झाला आहे. त्यात सामना खेळताना खेळाडूंची दमछाक तर होच आहेच, शिवाय त्यांना चेंडूही निट मारता येत नाही. दरवर्षी चिखलातच स्पर्धा झाल्या खेळाडूंचे कौशल्य दिसणार नाही, अशी भीती फुटबॉलप्रेमी व्यक्त करत आहेत.
चांगले मैदान मिळत नाही…
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 30 जुलैपुर्वी मनपा, जिल्हा व विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा पूर्ण करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्हा क्रीडा कार्यालय स्पर्धांचे नियोजन केले आहे. चिखलात होणाऱया सामन्यांमुळे खेळाडूंच्या परिणाम होतो, हा पुर्वअनुभव असल्याने आम्ही विविध शाळांची स्पर्धेसाठी मैदाने मागितली होती. पण ती न दिल्याने नाईलाजास्तव क्रीडा संकुलातच स्पर्धात स्पर्धा आयोजित कराव्या लागत आहेत.
डॉ. चंद्रशेखर साखरे (जिल्हा क्रीडा अधिकारी)