भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा : मविआ सरकारकडून इम्पिरिकल डेटा संदर्भात फसवणूक
कोल्हापूर प्रतिनिधी
लोकशाहीची पूर थट्टा करून सत्तेवर आलेले महाविकास आघाडी सरकार इम्पिरिकल डेटा संकलन प्रक्रियेबाबत फसवणूक करत आहे. जो पर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नाही, तो पर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची कोणतीही निवडणूक होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.
चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे राज्यसभेवरील नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सत्यजित उर्फ नाना कदम, उपस्थित होते.
राज्यसभेची नुकतीच झालेली निवडणूक, ओबीसी आरक्षण, मविआ सरकारचे धोरण आदी मुद्दय़ांवर चंद्रकांतदादा यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ओबीसींच्या इम्पिरिकल डेटा संदर्भात आज सद्यःस्थिती काय आहे? हे राज्य सरकार सांगू शकत नाही. मध्यप्रदेश सरकारने गतीने प्रक्रिया राबवून इम्पिरिकल डेटा गोळा करून ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून दिले. पण गेली वर्षभर मविआ सरकार टाळाटाळ करत आहे. इम्पिरिकल डेटा गोळा करणे सोपे आहे. महापालिकेतील घरफाळा विभागातील कर्मचाऱयांना घर टू घर माहिती असते. त्यांचा वापर करून जर ओबीसींची जातनिहाय माहिती संकलित करणे शक्य आहे, पण मविआ सरकार ते करताना दिसत नाही. आमच्या आमदार गोपिचंद पडळकर यांनी आटपाडीत इम्पिरिकल डेटा गोळा केला. त्यांना शक्य आहे, तर मविआ सरकारला ते का शक्य होत नाही, असा सवालही चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.
विधान परिषदेत भाजपचे पाचही उमेदवार जिंकणार
विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न केले. पण मविआने प्रतिसाद न दिल्याने आता 20 तारखेला मतदान होईल. भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत. मविआतील अंतर्गंत नाराजी, दुफळी यामुळे भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील. तो मविआचा पर्यायाने राज्य सरकारचा नैतिक पराभव असेल, असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
धनंजय महाडिक पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व करतील
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, महाडिक यांची स्वतःची ताकद आहे. त्यांच्या रूपाने भाजपला पश्चिम महराष्ट्रात चांगले नेतृत्व लाभले आहे. राज्यसभेवर कोल्हापूरला पहिलाच खासदार मिळाला आहे. (संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार होते.) राज्यसभा सदस्य हे संविधानिक पद आहे. महाडिक यांना संसदेतील कामाचा अनुभव आहे. संसदरत्न पुरस्कारही त्यांना लाभला आहे. त्यांनी प्रत्येक महिन्याला केंद्रातील एक मंत्री कोल्हापुरात आणून विकासाच्या दृष्टीने कार्य केले पाहिजे.
जिल्हय़ात महाडिक, कोरे, आवाडे प्लस भाजप असे राजकारण
चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्हय़ातील राजकीय समिकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले, महाडिक यांच्या खासदारकीमुळे भाजप आणखीन मजबूत झाली आहे. जिल्हय़ात आगामी काळातील निवडणुका जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या सहकार्याने लढविल्या जातील. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत ताराराणी आघाडीही भाजपबरोबर असेल. ज्या ठिकाणी भाजपऐवजी ताराराणी आघाडीकडून उमेदवार द्यावा लागेल, तेथे ताराराणी आघाडीचा उमेदवार दिला जाईल, असे सांगत चंद्रकांतदादा पाटील यांनी कोरे, आवाडे, महाडिक आणि भाजप या कॉम्बिनेशनने आपल्या पक्षाची वाटचाल असणार असल्याचे स्पष्ट केले.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले….
-राज्यसभा निवडणुकीत मुंगी होऊन साखर खाल्ली, म्हणून यश
-मविआ सरकारकडून राज्यात हम करे सो कायदा….
-पोलीस यंत्रणेचा वापर करून भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रासकोल्हापूर, हातकणंगले नव्हे तर राज्यातील 23 लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची नावे तयार.
-लोकसभेच्या 48, विधानसभेच्या 288 जागा लढविण्यास भाजप सज्ज.
-मविआ सरकार पडणार नाही, मात्र अंतर्गंत दुफळी वाढत जाईल.