कोल्हापूर- गणेशोत्सव तोंडावर आहे, शहरातील रस्त्यांची पूर्णतः चाळण झाली आहे. रस्त्यांचे पॅचवर्क करण्यासाठी महापालिकेकडून काहीही नियोजन केलेले नाही. गणेश आगमन, विसर्जन मिरवणुकीवेळी खड्डेमय रस्त्यांचा गणेशभक्तांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यांच्या संतापाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शहरातील खराब रस्त्यांचे पॅचवर्कचे काम तत्काळ हाती घ्या. टेंडर प्रक्रीयेमध्ये वेळ जाणार असल्याने अगोदर पॅचवर्क करा, मग टेंडर प्रक्रीया राबवा, अशी आग्रही मागणी महाविकास आघाडीचे माजी नगरसेवकांनी केली.
शहरातील विविध प्रश्नांबाबत महाविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये शहरातील विविध प्रश्नांवरुन माजी नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. तसेच अधिकाऱयांनाही धारेवर धरले. कचरा, पथदिवे यासह अन्य प्रश्नांवरुन अधिकाऱयांची खरडपट्टी केली.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी गणेशोत्सव तोंडावर असूनही रस्त्यांच्या पॅचवर्क संदर्भात महापालिकेने कोणतेचे नियोजन केलेले नाही. आगमन, विसर्जन मिरवणुकीत खड्डय़ांचे विघ्न येणार नाही यासाठी पॅचवर्कचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. अत्यावश्यक बाब म्हणून प्रथम रस्त्यांचे पॅचवर्क करा, मग टेंडर प्रक्रीया राबवा अशी मागणी केली. यावर पुढील आठवडाभरात चारही विभागीय कार्यालयातील रस्त्यांचा आढावा घेवून पॅचवर्कच्या कामास सुरवात करत असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेवक भुपाल शेटे, आदिल फरास, सुनील मोदी, ईश्वर परमार, अशोक जाधव, संदीप नेजदार, राजू साबळे, दूर्वास कदम, शिवानंद बनछोडे, प्रतापसिंह जाधव, जय पटकारे, महेश उत्तुरे, सुयोग मगदूम, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी उपस्थित होते.
कचरा उठावाची यंत्रणा कागदावरच
शहरात नियमित कचरा उठाव करण्यासाठी ट्रक्टर ट्रॉली घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण याबाबत कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. कचरा उठावाची यंत्रणा कोलमडली आहे. शहरासह उपनगरात पुन्हा उघडय़ावर कचरा साचत आहे. दुपारच्या फेऱया होत नाहीत, कचरा उठावाची यंत्रणा केवळ कागदावरच असल्याचे सांगत अधिकाऱयांना धारेवर धरण्यात आले. यावर पुढील दहा दिवसात रस्त्यावर कचरा दिसणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पथदिवे बंद, अंधाराचे साम्राज्य
हलक्या क्वालिटेचे पथदिवे वापरल्याने ते सध्या बंद पडले असून शहारासह उपनगरातील अनेक भागात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य आहे. अंधाराचा फायदा घेत येथे चोऱयांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अंधाराचीही नागरिकांमध्ये भिती आहे. ठेकेदार कंपनीशी यासंदर्भात चर्चा केल्यास त्यांच्याकडून अरेरावीची भाषा वापरली जाते. कागदी खेळामुळे दोन ते तीन महिने झाले तरी नादुरुस्त पथदिवे दुरुस्त झालेले नाहीत, असे सांगत माजी नगरसेवक आक्रमक झाले. यावर पुढील पंधारा दिवसात रेऑनचे दिवे रिप्लेस करत असून हायमास्क दिव्यांचे काम १५ दिवसात करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला
कोंडाळय़ांमुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. नागरिकांमध्ये पुन्हा एकदा कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. लहान मुलांना घराबाहेर सोडणे मुश्कील बनले असल्याचे माजी सदस्यांनी सांगितले. यावर एक नवीन डॉग स्कॉड लवकरच तयार करत असून नवीन निर्बिजीकरण केंद्रही सुरु करत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
प्रत्येक प्रभागात २५लाखांचा निधी द्या
गेल्या दोन वर्षात शासन आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतूनच शहरात विकासकामे झाली आहेत. महापालिकेने स्वनिधीतून कोणतीही कामे केलेली नाहीत. त्यामुळे भेदभाव न करता प्रत्येक प्रभागात 25 लाख रुपयांचा निधी देण्याची मागणीही यावेळी माजी सदस्यांनी केली.