अथक वैद्यकीय प्रयत्नातून म्युकरमायकोसिसची गाठ केली नाहीशी; नामवंत न्युरोसर्जननी हार मानल्यानंतर मुलग्याने सुरु केली लढाई; डॉक्टर मुलग्याच्या पितृप्रेमापुढे म्युकरमायकोसिसची हार
कृष्णात चौगले कोल्हापूर
वडिलांच्या लहान मेंदूच्या पुढील बाजूस म्युकरमायकोसिसची (बुरशी) गाठ, त्यामुळे लहान मेंदूला रक्तपुरवठा करणारी वाहिनी खराब झालेली. डोक्याच्या कवठीचा खालील भाग पुर्णपणे म्युकरमायकोसिसने व्यापलेला. कोल्हापूरसह मुंबई, दिल्ली, बेंगलोरमधील नामवंत न्युरोसर्जन डॉक्टरांनी जास्तीत जास्त एक ते दोन महिने वडिलांचे आयुष्यमान असल्याचे सांगून घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. पण आपल्यासाठी देह झिजवलेल्या पित्याला कोणत्याही परिस्थितीत आजारातून वाचवायचे अशी शपथ घेतलेल्या डॉक्टर मुलग्याने सावकाराकडील कर्ज काढून घरातच अतिदक्षता विभाग सुरु केला. सुमारे 70 ते 80 लाख रूपये खर्च करून तब्बल दीड वर्षे त्यांच्यावर औषधोपचार केलेत. मरणासन्न अवस्थेत असलेला बाप बरा झाल्यानंतर त्या मुलग्याने दोन महिने जगणार असे सांगणाऱ्या प्रथितयश न्युरोसर्जनसमोर त्यांना उभा केले. आणि ‘इटस् मिरॅकल्स’ म्हणून त्यांनी तोंडात बोट घातले. मुलग्याच्या पितृप्रेमामुळेच हा चमत्कार घडला असल्याचे त्यांनी मान्य केले.
सांगली जिह्यातील आटपाडी येथील कोंडिबा गाडवे यांनी स्वतः रोजगार हमी योजनेतील कामे करून शिक्षण घेतले. त्यानंतर शिक्षक म्हणून नोकरी करताना आपल्या मुलांबरोबरच शाळेतील अनेक गोरगरीब मुलांचा शैक्षणिक खर्चाचा भार उचलला. सामाजिक काम करताना त्यांनी 18 एकर जमिन विकली. मुलगा विजय गाडवे यांना डॉक्टर (एम.डी.मेडिसिन) केले. डॉ. विजय सीपीआर रुग्णालयामध्ये रुजू होऊन सहा महिने झाल्यानंतर शिक्षक पेशातून सेवानिवृत्त झालेल्या कोंडिबा यांना 27 नोव्हेंबर 2016 रोजी पक्षाघात झाला. पुढील तपासणीमध्ये त्यांना म्युकरमायकोसिचे निदान झाले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी लाखो रूपयांची गरज असली तरी डॉ. विजय यांच्याकडे अर्थिक दुष्काळ होता. समाजकारणासाठी सढळ हाताने मदत केल्यामुळे वडिलांकडेही पैसे नव्हते. तो नोटाबंदीचा काळ असल्यामुळे इतरांकडूनही पुरेसे पैसेही उपलब्ध होत नव्हते. अशा परिस्थितीत मित्र परिवार आणि खासगी सावकाराकडून पैसे घेऊन वडिलांवर उपचार सुरु केले. आवश्यक औषधोपचार करून देखील आजारातून त्यांना किंचितही बरे वाटले नाही. त्यानंतर मुंबई, दिल्ली, बेंगलोर येथील नामांकित हॉस्पिटल्सच्या प्रसिद्ध डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोल्हापूरात उपचार सुरु केले. तरीही म्युकरमायकोसिसने पाठ सोडली नाही. मेंदूला गाठ असल्यामुळे ऑपरेशन करणेही शक्य नव्हते. त्यामुळे हार मानलेल्या डॉक्टरांनी केंडिबा यांना यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. पण मुलगा डॉ. विजय गाडवे यांनी आपला प्रयत्न सोडला नाही.
ऑपरेशनशिवाय म्युकरमायकोसिस झाला बरा
वडिलांना घरी आणल्यानंतर डॉ. गाडवे यांनी घरातच मिनी आयसीयू तयार केला. 56 हजारांचे एक इंजेक्शन याप्रमाणे सलग 52 दिवसांचा डोस पूर्ण केला. यासाठी आवश्यक अर्थिक तरतुदीसाठी त्यांना सावकारांचे दार ठोठावावे लागले. तरीही त्यांच्या प्रकृतीत आवश्यक सुधारणा झाली नाही. पण डॉ. गाडवे यांनी टप्प्याटप्प्याने एक ते दीड वर्षे पुढील उपचार सुरु ठेवले. मानसिक आधार दिला. अखेर ऑपरेशनशिवाय केवळ औषधोपचारावर लहान मेंदू समोर असणारी म्युकरमायकोसिसची गाठ नाहीशी झाली. आज त्यांच्या वडिलांची प्रकृती पूर्णपणे बरी झाली असून त्यांची दिनचर्या सुरळीतपणे सुरु आहे. केवळ औषधावर म्युकरमायकोसिसची गाठ बरी झाल्याचे देशातील हे पहिलेच उदाहरण असून वडिलांवर असलेल्या निस्सिम प्रेमामुळेच हे शक्य झाले असल्याचे डॉ. गाडवे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. माझ्या वडिलांप्रमाणेच अन्य वृद्ध नागरीकांची अवस्था होऊ नये, त्यांना अल्प खर्चात आरोग्यसेवा मिळावी या हेतूने कोल्हापूरातील दुधाळी परिसरात कपिलेश्वर हॉस्पिटल सुरु केले आहे. कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कोरोना रूग्णांपैकी 92 टक्के रुग्णांना बरे करणारे हे कोल्हापूरातील तिसरे हॉस्पिटल आहे. या कालावधीत गोरगरीब रुग्णांचे 20 लाख रूपये वैद्यकिय बिल माफ केले असल्याचे डॉ. गाडवे यांनी सांगितले.
आई-वडिलांचा त्याग विसरू नका
मुलांनी आई-वडिलांचा नेहमी आदर करावा. त्यांनी केलेला त्याग विसरू नये. आज उच्चभ्रु वस्तीतील अनेक वृद्ध वृद्धाश्रमात दिसतात. भौतिक सुखाच्या शोधात मुले वृद्ध आई वडिलांची हेळसांड करतात. केवळ भौतिक सोयी, सुविधा म्हणजे सुख नसून जन्मदात्यांच्या चेहऱयावरील आनंद हाच आपला आनंद मानला, त्यांना कधीही अंतर दिले नाही, तर त्या मुलाचे आयुष्य निश्चितच आनंददायी होईल.
डॉ. विजय गाडवे, कपिलेश्वर हॉस्पिटल, दुधाळी.