शहरातील तीन हजार कुटुंबे होणार स्थलांतरीत; ग्रामीण भागातही शेकडो नागरिक अस्वस्थ; प्रशासनाची जय्यत तयारी
कोल्हापूर : प्रतिनिधी
मागील दोन दिवसांपासून धरणक्षेत्रासह जिह्यात सर्वदूर कोसळणाऱया पावसामुळे पूरग्रस्त परिसरात धास्ती वाढली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने मागील महापुराच्या आठवणीने कोल्हापूरकर भितीच्या छायेत आहेत. शहरातील सुमारे तीन हजार कुटुंबांनी स्थलांतराची तयारी केली आहे. शहर परिसरातील पूरग्रस्त कॉलन्यातील नागरिकांनी खबरदारी म्हणून साहित्य सुरक्षित हालवण्याच्या तयारीने वाहने रस्त्यावर आणून लावली आहेत. जिल्हय़ाच्या पुरग्रस्त भागातही अशीच स्थिती असून जनावरांसह शेकडो नागरिक स्थलांतराच्या तयारीत आहेत. दरम्यान, संभाव्य पूरस्थितीमुळे प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे.
अधिक वाचा– जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत रेड अलर्ट
जिह्यात धुवाँधार कोसळणाऱया पावसाने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. पंचगंगा तालीम, शाहूपूरी कुंभार गल्ली, रामानंदनगर आदी जयंती नाल्याच्या काठावरील भागात सर्वात प्रथम पाणी येण्यास सुरूवात होवू शकते. वाढणाऱया पुराच्या पाण्याने कोल्हापूकरांचा ठोका चुकवला आहे. पुराच्या धास्तीने बहुतांश शहरवासीयांनी घरीच बसणे पसंत केले. संतधार पावसामुळे शहरवासीयांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे.
अपार्टमेंटमध्ये भिती
बापट कॅम्प, जाधववाडी, मुक्तसैनिक वसाहतीची पिछाडी बाजू, काटेमळा, रमळमळा, उलपे मळा, कसबा बावडा रेणुका मंदिराच्या पिछाडीची बाजू आदी परिसरातील अपार्टमेन्टच्या बेसमेन्टमध्ये मागील महापुरात एका रात्रीत पाणी शिरले होते. अगदी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाणी गेले होते. अपार्टमेन्टला येणाऱया रस्त्यावरही पाणी आल्याने अनेकजण अडकून पडले होते. तळमजल्यावर असणाऱयांच्या प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. तर पार्कींगमध्ये लावलेली वाहने पुरात अडकल्याने लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले होते. त्यामुळे यावर्षी खबरदारी म्हणून मागील वर्षी पूर आलेल्या अपार्टमेंटमधील नागरिकांना आताच सुरक्षित ठिकाणी वाहने लावण्याचा विचारात आहेत. आत्पकालीन स्थितीत गाडी सुरक्षित राहिल, यासाठी चारचाकी लावण्यासाठी जागा शोधली जात आहे. तसेच कुटुंबाला इतरत्र घेवून जाणे सोपे व्हावे यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
कुंभार गल्ली आणि बापट कॅम्पात धांदल
बापट कॅम्प व कुंभार गल्लीत सध्या गणेश मूर्ती तयार करण्याची जय्यत तयारी सुरु आहे. घरांच्या दारात मंडप घालून गणेश मूर्ती बनविण्याचे काम गेली तीन महिने सुरु आहे. पावसाचा जोर वाढल्याने या परिसरात पाणी शिरु शकते. त्यामुळे गणेश मूर्ती सुरक्षितस्थळी हालविण्यासाठी मूर्तीकारांची धांदल सुरु झाली आहे.
शहरातील पूरबाधीत ठिकाणे
बापट कॅम्प, जाधववाडी परिसर, कत्तलखाना परिसर, जुनी जाधववाडी, युनायटेड एजन्सी पिछाडी परिसर, राजीव गांधी झोपडपट्टी, शिरोली जकातनाका परिसर, कदमवाडी परिसर, साळोखेमळा, भोसलेपार्क, महालक्ष्मीनगर, दलाल मार्केट परिसर कामगार चाळ, रमणमळा न्यु पॅलेस परिसर, नाईकमळा, पुंगावकर मळा, माळी मळा, दिप्ती पार्क, चित्रदुर्ग मठाच्या पाठीमागे, शाहू पुल, व्हिनस कॉर्नर चौक, राजहंस प्रेस परिसर, महावीर गार्डन परिसर, रामानंदनगर पुल परिसर ओढयाकाठची घरे, गायकवाडवाड, जामदार क्लब, जगद्गुरुमठ परिसर, पंचगंगा तालीम, मस्कुती तलाव, गुणे बोळ, सिध्दार्थनगर, सिता कॉलनी, राजाराम कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, दुधाळी परिसर, गवत मंडई, शाहूपुरी कुंभार गल्ली गवत मंडई गल्ली नं.6 ते 8, यादवनगर, गोमती पुल आदी शहराच्या नागरिवस्तीत पाणी शिरले आहे. कसबा बावडा शिये नाका, वडणगे रस्ता, रत्नागिरी महामार्ग, व्हिनस कॉर्नर, कुंभारगल्ली, लक्ष्मीपुरी व शाहुपूरी आदी शहराच्या प्रमुख भागात व रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता असल्याने महापालिका आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
दुषीत पाणी
पंचगंगेच्या संभाव्य पुरामुळे महापालिकेची जलशुध्दीकरण यंत्रणा सुस्थितीत आहे. शहरातील सर्व भागात पाणीपुरवठा सुरळीत आहे. मात्र नळाला गाळमिश्रीत पाणी येत आहे. दुषीत पाणी पुरवठय़ामुळे गॅस्ट्रो, सर्दी, खोकला, ताप आदी जलजण्य आजारांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शहरवासीयांनी पाणी उकळून प्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.