गडहिंग्लजला घेतली आढावा बैठक
गडहिंग्लज प्रतिनिधी
सध्या सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे ओढे-नाले प्रवाहित झाले असून हिरण्यकेशी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दक्षता घेत साऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजीत पूरपरिस्थिती आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे, मुख्याधिकारी स्वरूप खारगे, माजी जि. प. उपाध्यक्ष सतिश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
अधिक वाचा- पालकमंत्रीपद गेल्यानंतरही सतेज पाटील महापूराला तोंड देण्यास सज्ज; दिल्या ‘ह्या’ सुचना
आमदार मुश्रीफ म्हणाले, तालुक्यातील नदीकाठच्या 25 आणि गडहिंग्लज शहरातील नदीवेस, भडगाव रोड परिसरातील पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना विश्वासात घेऊन पूरपरिस्थितीची माहिती द्यावी अशा सूचना दिल्या. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता नागरिकांना स्थलांतर, राहण्याची सोय, आरोग्याची सोय करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. प्रशासनाकडून झालेली तयारीची माहिती तहसिलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर यांनी दिली.
यावेळी शहरात थैमान घातलेल्या डेंग्यू, चिकनगुनियाबाबत चर्चा करण्यात झाली. शहरात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. यासाठी तातडीने पालिका प्रशासनाने पावले उचलावी, ‘घर टू घर’ पून्हा सर्व्हे करून डासांची उत्पत्ती होणारी केंद्र नष्ट करण्याच्या सुचना दिल्या. त्याचबरोर शहरातील कुंडय़ा, टायरी, मच्छरदानी, झाडी-झुडपे, फ्रिज आदी ठिकाणी स्वच्छ करण्याच्या सूचना द्याव्यात असे सांगितले. उपजिल्हा रुग्णालय आणि तालुका आरोग्य केंद्राकडून पुन्हा साथीच्या रोगाबाबत खबरदारीसाठी जनजागृती करण्याच्या सूचना मुश्रीफ यांनी आरोग्य विभागाला दिली. नागरिकांनी देखील काही लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीला माजी नगराध्यक्ष वसंतराव यमगेकर, सुरेश कोळकी, किरण कदम, सिध्दार्थ बन्ने, हारूण सय्यद, महेश सलवादे, गुंडय़ा पाटील, रश्मीराज देसाई, अमर मांगले आदी उपस्थित होते.
शहरासाठी 2 आरोग्यवर्धिनी केंद्र
गडहिंग्लज शहरासाठी पालिकेची स्वतंत्र आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता. गरज ओळखून जिल्हाधिकाऱयांनी 15 व्या वित्त आयोगातून शहरासाठी 2 आरोग्यवर्धिनी केंद्राला मंजुरी दिल्याची माहिती माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. भिमनगर आणि लाखेनगर येथील समाजमंदिरात सुरुवातीस सेवा सुरू होणार आहे.
लिलावाची बातमी वाचून अस्वस्थ
गडहिंग्लज साखर कारखान्याची जमीन लिलावातून विकल्याची बातमी मी आज वाचली. 59 कामगारांच्या देण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार जमिनी विकली. पण तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्या कामगारांना पुन्हा कामावर घेतले पाहिजे आणि त्यांची देणी ताळेबंदात घेतली तर चालेल अशी अपेक्षा व्यक्त केली. अन्यथा सहकारात देण्यासाठी चुकीचा पायंडा पडेल अशी भीती व्यक्त केली. ही प्रक्रिया थांबवता येते का ? यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी प्रशासक अरुण काकडे यांच्याशी फोनवर बोलून पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले.