लहरीबाज पावसाने महापुराचे चित्रच बदलले
सुधाकर काशीद / कोल्हापूर
मच्छिंद्री झाली की, समजायचं कोल्हापूर जिह्यात पुरेसा पाऊस झाला. पंचगंगा नदीला महापूर आला… आणि आता पूर ओसरायला सुरुवात होणार… कोल्हापूरचा पाऊस व पंचगंगा नदीचा महापूर मोजण्याचे हे एक पारंपरिक परिमाण होते. त्यामुळे कोल्हापुरात पंचगंगेला महापूर आला का? असे कोण एकमेकाला विचारतच नाही. पंचगंगेची मच्छिंद्री झाली काय? असेच एकमेकाला विचारतात आणि पुराची सद्यस्थिती समजावून घेतात. अर्थात गेल्या चार-पाच वर्षात मात्र लहरीबाज पावसाने मच्छिंद्रीलाच पुरते बुडवून टाकले आहे. आणि मच्छिंद्री ही एक केवळ आठवणीतली पूरस्थिती राहिली आहे.
अधिक वाचा- कोयनेचा पाणीसाठा २ टीएमसीने वाढून २३.०४ टीएमसीवर
मच्छिंद्री हा शब्द पावसाळ्यात कोल्हापुरात सर्वतोमुखी असतो. मच्छिंद्री म्हणजे पंचगंगेच्या महापुराची उच्चतम पातळी मोजण्याची स्थिती. पंचगंगा नदीवर 1878 साली बांधलेला शिवाजी पूल आहे. सध्या नवीन पूल बांधल्यामुळे हा जुना पुल विनावापर आहे. या पुलाला पाच दगडी कमानी आहेत. या कमानी ज्या दगडी पिलरवर उभ्या केल्या आहेत. तेथे बांधकामालाच माशाच्या शरीरासारखा निमुळता आकार आहे. या ठिकाणापर्यंत पुराचे पाणी पोहोचले किंवा या माशासारख्या निमुळत्या आकाराच्या पुलाच्या दगडावरून पंचगंगेच्या पुराचे पाणी वाहू लागले की मच्छिंद्री झाली.., असे समजले जायचे. त्या काळात मोबाईल नव्हते. तरीही मच्छिंद्री झाली… मच्छिंद्री झाली.. ही वार्ता कोल्हापुरात तोरस्कर चौकापासून ताराराणी चौकापर्यंत, आणि डांगे गल्लीपासून राजारामपुरी आडव्या गल्लीपर्यंत तासाभरात कर्णेपकर्णी पोहोचायची आणि पंचगंगेचा महापूर पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची झुंडच्या झुंड पुलाच्या दिशेने यायची. भाजलेली कणसे, उकडलेली कणसे, भुईमुगाच्या शेंगा, भेळ, मक्क्याच्या लाह्या, गरमागरम चहा त्याच्या गाडय़ा ब्रह्मपुरी चर्चजवळ लागायच्या. आता पटणार नाही. पण, शाळेच्या सहलीही महापूर पाहण्यासाठी या पुलावर यायच्या. त्यानंतर वर्गात बाई ‘मी पाहिलेला महापूर’ हा निबंध हमखास लिहून घ्यायच्या….
मच्छिंद्री ही पंचगंगेच्या महापुराची स्थिती म्हणजे पुरेसा पाऊस झाला. आता यापुढे महापुराचे पाणी फारसे वाढणार नाही.., हे मानले जात होते आणि ते खरेही ठरत होते. पण गेल्या पाच-सहा वर्षात मच्छिंद्रीच्या पलीकडे महापूर जाऊन भिडला. मच्छिंद्रीचा दगड तर पंधरा-पंधरा दिवस पाण्याखालीच राहिला. त्यामुळे मच्छिंद्री हा शब्द महापुराची पातळी सांगण्यासाठी वापरणे बंद झाले व व्हिनस कॉर्नर बुडाली काय, यावर महापुराची पातळी ठरवणे सुरू झाले.
मात्र आजही मच्छिंद्रीचा तो दगड जुन्या पुलावर आहे. किमान 142 पावसाळे व तेवढे महापूर या मच्छिंद्रीने अनुभवले आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या पूर अभ्यासात मच्छिंद्रीचा नक्कीच मोठा वाटा आहे. आणि मच्छिंद्री हा शब्द कोल्हापूरच्या पर्जन्य मानाचा इतिहास लिहिताना वापरावाच लागणारा मोलाचा शब्द आहे.