प्रयाग चिखली/प्रतिनिधी
प्रयाग चिखली परिसरातील पूरस्थिती गंभीर होऊ नये याकरता कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर रेडेडोह ठिकाणी पुल आणि मोरांचे बांधकाम तसेच प्रयाग चिखलीतील २०१९ साली घरे पडलेल्या मात्र मदतीपासून वंचित राहिलेल्या पूरग्रस्तांना न्याय देण्याबरोबरच सध्याच्या पूरस्थितीत शासनाकडून पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रयाग चिखली येथील पूरग्रस्त ग्रामस्थांना दिले.
करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली आंबेवाडी या गावांची पूरस्थिती नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रयाग चिखली येथील पूरग्रस्त ग्रामस्थांच्या वतीने गोकुळचे संचालक एस आर पाटील यांनी राजेश क्षीरसागर यांना निवेदन दिले. आंबेवाडी येथील पूरस्थिती पाहणी दरम्यान सरपंच सिकंदर मुजावर यांनी गावाचे पुनर्वसन करता भूखंड मिळावेत या मागणीचे निवेदन दिले.
हे ही वाचा : शिंदेंच्या धनुष्यबाणासमोर कोणाचाही बाण टिकणार नाही – अब्दुल सत्तार
दरम्यान, राजेश क्षीरसागर यांनी चिखली आंबेवाडी येथील पूरस्थिती ची माहिती घेऊन जिल्हा प्रशासनाला संभाव्य पूरस्थिती बाबत सूचना व आदेश दिले. तसेच ग्रामस्थांनी पुराची भीती न बाळगता जबाबदारीने प्रशासनाला मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करून पूरस्थिती काळात शासनाच्या वतीने आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जातील असे सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर तहसीलदार शितल मुळे -भामरे, गटविकास अधिकारी जयवंत उगले, करवीर तालुका आरोग्य अधिकारी जीडी नलवडे यांच्यासह शासनाचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी होत.