सुनील पाटील / आजरा
कोल्हापूर जिल्ह्य़ावर आजही छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आहे. या जिल्ह्य़ातील पुढारपणाने समाजहिताचे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले, ते निर्णय शासनालाही राज्य आणि देश पातळीवर राबवावे लागले. असाच एक महत्त्वपूर्ण असा विधवा प्रथा बंदीचा निर्णय हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला आणि राज्य शासनानेही हा निर्णय राज्यभर लागू करण्याचा निर्णय घेतला. पण सर्वच ठिकाणी आघाडीवर असलेल्या गडहिंग्लज उपविभागातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड हे तीनही तालुके विधवा प्रथा बंदीबाबत अद्यापही शांतच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात गडहिंग्लज उपविभाग पुढाकार घेणार का असा प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आला आहे.
कोल्हापूर जिल्हय़ाच्या एका टोकाला आणि कर्नाटक राज्याच्या सीमेला लागून असलेल्या या तीन्ही तालुक्यांची स्वतःची अशी ओळख जिल्हय़ात आहे. समाजवादी विचारसरणीचा प्रभाव या तीन्ही तालुक्यांवर आहे. काळाच्या ओघात काही बदल होत असले तरी अजूनही पुरोगामी विचारांची माणसं या विभागात आपापल्या परीने कार्यरत आहेत. कष्टकऱयांच्या हक्कांसाठी लढणारी, जटानिर्मूलन आणि देवदासी प्रथा बंदीसाठी झटणारी माणसं या विभागाने जिल्हय़ाला दिली आहेत. अंधश्रद्धा निर्मुलनाचे कामही या विभागात अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. चळवळींचे तालुके म्हणून आजरा व गडहिंग्लजची ओळख आहे. तर चंदगड तालुक्याला सत्यशोधक विचारधारेची पक्की बैठक आहे. त्यामुळे या तीन्ही तालुक्यांकडून नेहमीच क्रांतिकारी निर्णयांची अपेक्षा जिल्हय़ाला असते. नेत्रदान चळवळीमुळे गडहिंग्लज आणि त्यापाठोपाठ आजरा तालुक्याची नवी ओळख जिल्हा आणि राज्यात झाली आहे.
चंदगड तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केलेले स्व. माजी आमदार नरसिंगराव पाटील सत्यशोधक विचारधारेचे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काम कलेले अनेक कार्यकर्ते चंदगड व आजरा तालुक्यात आहेत. आजरा महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक असलेल्या डॉ. नवनाथ शिंदे यांनी आजरा तालुक्यातून सुरू केलेल्या जटानिर्मुलन चळवळीने या विभागासह जिल्हय़ातही चांगले काम केले. धरणग्रस्त चळवळींनी तर इथल्या धरणग्रस्तांना बोलतं करण्याचे काम केले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अन्यायाविरोधात लढाई करण्याचा वारसा आजरा तालुक्यातील विविध चळवळींनी जपला आहे. कॉ. संपत देसाई, कॉ. संजय तर्डेकर, शिवाजी गुरव, अशोक जाधव, संजय तर्डेकर या मंडळींनी धरणग्रस्तांच्या न्याय हक्कासाठीच्या लढाया आजही सुरू ठेवल्या आहेत.
गडहिंग्लज तालुक्यात देवदासी प्रथाबंदीविरोधात आवाज उठविण्याचे काम प्रा. विठ्ठल बन्ने यांनी केले. प्रा. बन्ने यांनी केलेल्या कामामुळे देवदासी प्रथा बंद होण्यासाठी मोठे काम झाले. देवदासींच्या मुलांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला. माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या विभागात सर्वसामान्यांच्या हक्कासाठी अनेक मोर्चे, आंदोलने झाल्याचे या विभागाने पाहिले आहे. चुकीच्या प्रथा, रूढी आणि परंपरांबरोबरच अन्यायाविरोधात लढण्याचा इतिहास असणारा हा विभाग विधवा प्रथा बंदीबाबत मात्र शांत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना हा प्रश्न अस्वस्थ करीत आहेत.
जिल्हय़ातील हेरवाड गावाने सर्वातप्रथम विधवा प्रथा बंद करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली. हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयानंतर राज्य शासनानेही राज्यातील प्रत्येक गावात विधवा प्रथा बंदीबाबत निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. हेरवाड पाठोपाठ हातकणंगले तालुक्यातील माणगांव, कोरोची तर करवीर तालुक्यातील खुपिरे या ग्रामपंचायतींनही विधवा प्रथा बंदीबाबत ठराव करून ही चळवळ बळकट करण्यासह हातभार लावला. पण याबाबत गडहिंग्लज विभागातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड हे तीनही तालुक्यात अद्यापही शांत का, असा प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आला आहे.