प्राथमिक शिक्षक बँकेसह कोजिमाशि संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची व्यूहरचना सुरु; गुरुजींच्या मतांवर ठरणार शिक्षक पुढाऱ्यांचे भवितव्य
कृष्णात चौगले कोल्हापूर
प्राथमिक शिक्षक बँकेसह कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या दोन्ही संस्थांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. आर्थिक सत्ताकेंद्र पुन्हा आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी शिक्षक नेत्यांनी कंबर कसली आहे. तर सत्ताधाऱ्यांच्या कामांतील त्रुटींवर बोट ठेवून सभासदांना सेवा पुरविण्यामध्ये ते कसे अयशस्वी ठरले याचा लेखाजोखा विरोधकांकडून मांडला जात आहे. त्यामुळे शिक्षण वर्तुळात राजकीय डावपेच सुरु झाले असून जिह्यातील गुरुजींच्या मतांवर आता शिक्षक नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे.
कोजिमाशि म्हणजे माध्यमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था. या संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. पण दोन्ही गटांकडून निवडणूक लढविणास इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या मोठी असल्यामुळे आणि जागा वाटपात मोठी तफावत असल्याने या संस्थेची दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना मानणारा विरोधी गट व सत्ताधारी नेते दादा लाड यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होईल असे चित्र आहे. प्रचारामध्ये मात्र सत्ताधारी गटाने मोठी आघाडी घेतली आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जे ठरलं, त्याच्या अंमलबजावणीचे काय ?
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या काळात पालकमंत्री सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथील आपल्या निवासस्थानी प्रमुख दावेदार असणाऱ्या दादासाहेब लाड यांच्यासह काही इच्छुकांना बोलावून घेतले होते. वैयक्तीकरित्या त्यांची बैठक घेऊन सर्वांना माघार घेण्याची विनंती करून त्यांना इतरत्र पुनर्वसन करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार लाड यांनी माघार घेतली. परिणामी कोजिमाशि संस्थेत आमदार आसगावकर यांच्या माध्यमातून लाड यांना होणारा विरोध मावळेल आणि शिक्षक बँकेतील त्यांचे राजकारण सुलभ होईल अशी तत्कालिन परिस्थितीत चर्चा होती. त्यामुळे आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक काळात जे ठरले होते, त्याची अंमलबजावणी होणार काय ? असा प्रश्न सत्ताधारी लाड गटातून उपस्थित केला जात आहे.
सद्यस्थितीत निवडणूक बिनविरोध करावी अशी भूमिका पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली आहे. त्यानुसार सत्ताधारी-विरोधकांच्या संस्था बिनविरोधसाठी बैठका देखील झाल्या. पण त्यामध्ये ठोस निर्णय झाला नाही. त्यानंतर आमदार आसगावकर व सत्ताधारी गटप्रमुख दादा लाड यांची पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीतही बिनविरोधची चर्चा असफल ठरली. त्यामुळे दोन्ही गटांनी एकत्र बसून मार्ग काढावा असे पालकमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष बाळ डेळेकर, माजी अध्यक्ष राजेंद्र रानमाळे, विरोधी संचालक समीर घोरपडे, कृती समितीचे बाबासाहेब पाटील आदींची बैठक झाली. विरोधी गटाने 21 पैकी 10 जागांची मागणी केली. यावेळी सत्ताधाऱ्यांनी दोन जागा देण्याचे मान्य केले. त्यानंतर विरोधकांनी नऊ जागांची मागणी केली. यावेळी सत्ताधाऱ्यांनी जास्तीत जास्त तीन जागा देण्याचे कबूल केले. संचालक पदाच्या मागणीत व देण्यात मोठी तफावत असल्यामुळे कोजिमाशिची निवडणूक अटळ असल्याचे चित्र आहे. अर्ज माघारी पूर्वी पालकमंत्री आणखी काय तोडगा काढतात, यावर निवडणुकीचा कौल स्पष्ट होणार आहे. आमदार आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी आघाडीचे नेतृत्व समीर घोरपडे, उदय पाटील, के.के.पाटील, बाबासाहेब पाटील आदी करत आहेत.
प्राथमिक शिक्षक बँकेसाठी होणार तिरंगी लढत
प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी गतपंचवार्षिक निवडणुकीप्रमाणेच तिरंगी लढत होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. सत्तारुढ गटाकडून राजाराम वरुटे (प्राथमिक शिक्षक संघ) यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेबांधणी सुरु असून सर्वसाधारण गटातील 12 तालुका प्रतिनिधींची उमेदवारी जाहीर केली आहे. तर विरोधी ‘आप’लं पुरोगामी समविचारी पॅनेलकडून 9 सर्वसाधारण आणि 2 राखीव गटातील अशा 11 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर शिक्षक संघ (थोरात गट), शिक्षक समिती व कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या तिसऱया पॅनेलकडून लवकरच उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत.
शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांची 13 वर्षापासून शिक्षक बँकेवर सत्ता आहे. गतनिवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत वरुटे गटाला 12 तर विरोधकांना पाच जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे निवडणुकीत तीन पॅनेल झालीत की त्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा फायदा होतो, ही बाब लक्षात घेऊन विरोधकांनी एकजूट करून एकच पॅनेल द्यायचे अशी पहिल्या टप्प्यात जोरदार चर्चा सुरु होती. पण जागा वाटपावरून विरोधातील शिक्षक संघटनांमध्ये बिनसल्यामुळे यावर्षीही तिरंगी लढत होणार आहे. ‘आप’लं पुरोगामी समविचारी पॅनेलचे प्रमुख गोविंद पाटील व शंकर पवार, प्रसाद पाटील आदींकडून पॅनेलची मजबूत बांधणी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.