कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्हात मुसळधार पाऊस सुरूच आहे. दुपारच्या उघडीपनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून धरणक्षेत्रात झालेल्या पावसाने धरणातील पाण्यात वाढ झाली आहे. तर 4 वाजेपर्यंत जिल्ह्यातील अनेक छोटी-मोठी धरणे पाण्याखाली गेली आहेत.
राधनगरी तालुका आणि राधानगरी धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असून यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या राधानगरी धरणात 87.76 दलघमी पाणीसाठा असून दुपारी 4 वाजेपर्यंत राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. मुसळधार पावसाने जिह्यातील एकूण 29 बंधारे पाण्याखाली आहेत. यापैकी घटप्रभा मध्यम प्रकल्प आज दुपारी 1 वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. याचबरोबर भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे व राशिवडे येथिल बंधाऱ्यावर पाणी आले आहे. तसेच जिल्ह्यातील कासारी नदीवरील वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, पेंडाखळे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील मांडूकली, शेणवडे, कळे व वेतवडे, धामणी नदीवरील सुळे व अंबार्डे, दुधगंगा नदीवरील दत्तवाड, तुळशी नदीवरील बीड व वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर असे 29 बंधारे पाण्याखाली आहेत.