पंचगंगेची पाणीपातळी 1 फुटाने घटली : राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग : गगनबावडय़ात सर्वाधिक 86.8 मि.मी पाऊस : पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी काहीअंशी ओसरला. धरणक्षेत्रात जोरदार तर जिल्ह्यात रिपरिप असे चित्र होते. पंचगंगेची पाणीपातळीत एक फुटाने घटली असून सध्या 30.11 फुट इतकी आहे. राधानगरी धरणातून 1200 क्युसेक जलविर्सग सुरु आहे. अद्याप 27 बंधारे पाण्याखाली आहेत. हवामान विभागाने 12 जुलैपर्यंत जिल्ह्यात ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पूरस्थितीची धास्ती घेतलेल्या नागरीकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पाटबंधारे विभागाच्या अंदाजानुसार पुढील 20 ते 25 दिवस पावसाची हीच स्थिती कायम राहिली तर जिह्यास महापुराला सामोरे जावे लागणार नाही.
27 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर. धामणी नदीवरील- सुळे व अंबार्डे, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वारणा नदीवरील- चिंचोली असे 27 बंधारे पाण्याखाली आहेत.
पंचगंगेची पाणीपातळी 30.11 फुटांवर
पंचगंगेची पाणीपातळी 30.11 फुटांवर असून सुर्वे 30.2, रुई 60.6, इचलकरंजी 56.6, तेरवाड 49.9, शिरोळ 39, नृसिंहवाडी 35.3, राजापूर 25.4 तर नजीकच्या सांगली 8.3 व अंकली 12.7 अशी आहे.
गगनबावडा येथे सर्वाधिक 86.8 मिमी पाऊस
गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 86.8 मिमी पावसाची नोंद झाली असून हातकणंगले 3.8, शिरोळ 3.4, पन्हाळा 18.8, शाहूवाडी- 26.6, राधानगरी- 28.4, करवीर- 11, कागल- 12.5, गडहिंग्लज- 9.7, भुदरगड- 41.5, आजरा-25 , तर चंदगड तालुक्यात 33.2 पावसाची नोंद झाली आहे.